अजित पवार यांचा शब्द सुनेत्रा पवार पूर्ण करणार काय?, दिल्लीत महाराष्ट्र सदनातील यशवंतरावांचा पुतळा कधी बदलणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 15:44 IST2026-03-12T15:44:00+5:302026-03-12T15:44:38+5:30
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदरचा पुतळा बदलण्याचा शब्द दिला. पण या दिलेल्या शब्दाला आता दोन वर्षे पूर्ण होत आली, मात्र त्यात काहीच प्रगती दिसत नाही

अजित पवार यांचा शब्द सुनेत्रा पवार पूर्ण करणार काय?, दिल्लीत महाराष्ट्र सदनातील यशवंतरावांचा पुतळा कधी बदलणार ?
प्रमोद सुकरे
कराड : दिल्लीत महाराष्ट्र सदनमधील आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा व्यक्तिमत्वाशी विसंगत असणारा पुतळा गत दोन वर्षांपासून यशवंतप्रेमींना खटकत आहे. याबाबत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुतळा बदलण्याची घोषणा पावसाळी अधिवेशनात केली होती. मात्र, त्याला दोन वर्षे होत आली तरी काहीच कार्यवाही झालेली दिसत नाही. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांचा व्यक्तिमत्वाशी विसंगत असणारा पुतळा बदलला जाणार का? अजित पवारांनी दिलेला शब्द विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पूर्ण करणार का? अशा प्रतिक्रिया त्यांची कर्मभूमी असलेल्या कराडमधील यशवंतप्रेमींमधून व्यक्त होत आहेत.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची ओळख आहे. म्हणूनच त्यांच्या कार्याची दखल घेत दिल्लीत महाराष्ट्र सदनमध्ये त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळा बसवणे ही कराडकरांसाठीच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. पण त्या पुतळ्याची छायाचित्रे समोर आल्यानंतर यशवंतप्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. कारण हा पुतळा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी विसंगत वाटत आहे.
यशवंतप्रेमींची नाराजी लक्षात आल्यावर याबाबत ५ जुलै २०२४ रोजी पावसाळी अधिवेशनात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदरचा पुतळा बदलण्याचा शब्द दिला. पण या दिलेल्या शब्दाला आता दोन वर्षे पूर्ण होत आली, मात्र त्यात काहीच प्रगती दिसत नाही. साहजिकच यशवंतप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे.
महिनाभरापूर्वी अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे आता यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा बदलण्याच्या त्यांनी दिलेल्या शब्दाचं काय? हा प्रश्न यशवंतप्रेमींच्या मनात घर करत आहे. त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार आता हा शब्द पूर्ण करणार का? याकडे यशवंतप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.
यशवंतप्रेमींमध्ये नाराजी
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून कराडची ओळख आहे. कराडातील त्यांचे स्मृतिस्थळ जणू राजकीय पंढरी म्हणून ओळखले जाते. प्रत्येक वर्षी त्यांच्या पुण्यतिथीला राज्यातील राजकीय मंडळी येथे नतमस्तक होण्यासाठी येतात; पण त्यांचा महाराष्ट्र सदनातील बसवलेला पुतळा बदलला जात नसल्याने यशवंतप्रेमींमधून नाराजी समोर येणे स्वाभाविक आहे.