टोलनाक्यावर वाहनांची वर्दळ वाढली, तासवडेत रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 11:28 IST2020-11-23T11:23:45+5:302020-11-23T11:28:10+5:30
लॉकडाऊनमुळे गत आठ महिन्यात घराबाहेर पडता न आलेली मंडळी कोरोनाचा संसर्ग कमी झाला असल्याने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गावाकडे आली होती. हे चाकरमानी आता शहराकडे परतू लागले असून, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे, ता. कऱ्हाड टोलनाक्यावर वाहनांची वर्दळ वाढल्याचे दिसून येत आहे. टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

टोलनाक्यावर वाहनांची वर्दळ वाढली, तासवडेत रांगा
कऱ्हाड : लॉकडाऊनमुळे गत आठ महिन्यात घराबाहेर पडता न आलेली मंडळी कोरोनाचा संसर्ग कमी झाला असल्याने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गावाकडे आली होती. हे चाकरमानी आता शहराकडे परतू लागले असून, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे, ता. कऱ्हाड टोलनाक्यावर वाहनांची वर्दळ वाढल्याचे दिसून येत आहे. टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
आठ महिन्यांपूर्वी कोरोना आजाराच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. परिणामी नाईलाजाने सर्वांना घरात थांबावे लागले होते. लॉकडाऊनमुळे देवदर्शनासह अनेकांची इतर कामेही रखडली होती. दरम्यान, राज्य शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे गत आठ महिन्यांत घराबाहेर पडता न आलेली मंडळी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आपली रखडलेली कामे करण्यासाठी व नातेवाइकांच्या भेटीगाठीसाठी गावी आली होती.
गत आठवड्यात पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोलनाक्यावर सातारा ते कोल्हापूर जाणाऱ्या लेनवर वाहनांची गर्दी दिसून येत होती. मात्र, सध्या दिवाळी सण आटोपून अनेकजण नोकरी, व्यवसायासाठी पुणे, मुंबईकडे परतू लागले आहेत. त्यामुळे कोल्हापूर ते सातारा लेनवर वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे.
देवदर्शनासाठीही अनेकांची धावाधाव
गत आठवड्यापासून राज्यातील बंद असलेली मंदिरे खुली करण्याचा निर्णय झाला असल्याने देवदर्शनासह पर्यटनासाठीही अनेकजण बाहेर पडले आहेत. त्यामुळे महामार्गावरील वर्दळ आणखी वाढली आहे. टोलनाक्यावरून वाहनधारकांना सहज व जलदरीत्या प्रवास करता यावा यासाठी जादा मनुष्यबळासह आवश्यक उपाययोजनांचे नियोजन केले आहे.