राज्यात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ठेवा, यासाठी नामवंत पहिलवानांची मुंबईकडे कूच, आज आझाद मैदानात आक्रोश मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 11:35 IST2026-03-12T11:31:31+5:302026-03-12T11:35:24+5:30
राज्यात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी, या प्रमुख मागणीसाठी पैलवान गुरुवारी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत.

राज्यात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ठेवा, यासाठी नामवंत पहिलवानांची मुंबईकडे कूच, आज आझाद मैदानात आक्रोश मोर्चा
संतोष गुरव
लोकमत न्यूज नेटवर्क
कराड : सातारा, सांगली जिल्ह्यांतील ४० महाराष्ट्र केसरी, १० हिंद केसरींसह २ हजार पैलवानांनी आपल्या मानाच्या गदांसह बुधवारी कराड येथून सकाळी ११ वाजता आक्रोश मोर्चास सुरुवात केली. राज्यात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी, या प्रमुख मागणीसाठी पैलवान गुरुवारी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. ऑलिम्पिक पदक विजेेते खाशाबा जाधव यांच्या स्मारकास अभिवादन केल्यानंतर मुंबईच्या दिशेने सर्वजण रवाना झाले.
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, कोल्हापूरचे महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, नामदेव मुळे, धनाजी फडतरे, रामा माने, उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील, उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार यांच्यासह शेकडो पैलवानांची यावेळी उपस्थित होते.
गदा सरकारकडे जमा करणार : चंद्रहार पाटील
साठ वर्षांपासून जी महाराष्ट्र केसरी पदासाठी कुस्ती स्पर्धेची परंपरा आहे, ती पुढे अखंडित सुरू राहावी, अशी अपेक्षा होती. मात्र, दुर्दैवाने महाराष्ट्रात यावर्षी चार कुस्ती स्पर्धा पार पडणार आहेत हे थांबले पाहिजे. जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या गदा सरकारकडे जमा करणार असल्याचे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी सांगितले.
काय आहेत मागण्या?
१) महाराष्ट्रात वर्षातून एकदाच महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवावी.
२) कुस्तीतील पैलवानांना राज्य सरकारकडून सुविधा द्याव्यात.
३) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची हेळसांड थांबवावी.
४) शासनाने स्वतः अधिकृतपणे महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवावी.