वणव्याची धग टाकतेय जलसंधारणाच्या कामांवर माती,साखळी अखंडीतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 12:13 IST2021-04-06T12:11:15+5:302021-04-06T12:13:49+5:30
Forest Fire Satara- गावांमध्ये जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. वणवा लागल्यानंतर जमीन पोकळ होते. वळीवाचा पाऊस ही जमीन अधिक नाजुक करते. परिणामी मान्सुनच्या पावसात जमिनीचा उत्पादक वरचा थर जलस्त्रोतांमध्ये वाहून नेला जातो. ज्या गावांमध्ये जलसंधारणाची कामे झालेली आहेत, तिथंही बांध-बंधारे वाहून आणलेल्या मातीने भरून जातात. त्यामुळे बंधाऱ्यांची पाणी धारण क्षमता हळूहळू कमी होत नष्ट होते.

वणव्याची धग टाकतेय जलसंधारणाच्या कामांवर माती,साखळी अखंडीतच
प्रगती जाधव-पाटील
सातारा : गावांमध्ये जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. वणवा लागल्यानंतर जमीन पोकळ होते. वळीवाचा पाऊस ही जमीन अधिक नाजुक करते. परिणामी मान्सुनच्या पावसात जमिनीचा उत्पादक वरचा थर जलस्त्रोतांमध्ये वाहून नेला जातो. ज्या गावांमध्ये जलसंधारणाची कामे झालेली आहेत, तिथंही बांध-बंधारे वाहून आणलेल्या मातीने भरून जातात. त्यामुळे बंधाऱ्यांची पाणी धारण क्षमता हळूहळू कमी होत नष्ट होते.
परिणामी केलेले कामंही मातीमोल होतंय. त्यामुळे वणवा लागलेली जमीन उजाड, उघडे, बोडके डोंगर तयार होतात. त्यामुळे गावच्या हद्दीत वणवा लागू न देण्याच्या निकषाचा समावेश पुरस्कारांमध्ये करावा. जेणे करुन स्थानिक पातळीवरच वणवा लावणा-यांना प्रतिबंध बसेल तसेच एखाद्याने आगाउपणा केल्यास त्यांना शोधून केसेस दाखल करणे सोईचे होईल.
सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या साखळीसह वणव्याची साखळीही खंडीत करणं प्रशासनापुढं आव्हान बनुन राहिलं आहे. गेल्या दिड महिन्यात तब्बल १५० हून अधिक ठिकाणी वनवे लागून अनमोल वनसंपत्ती नष्ट झाली. म्हणजे रोज किमान तीन ठिकाणी कुठे ना कुठे तरी वनवा लागत होता. वणवे विझवण्यासाठी वनविभाग प्रयत्न करते. पण वणवा लागूच नये यावर जोर दिला तर ही वनसंपदा वाचवता येऊ शकेल, असा आशावाद पर्यावरणप्रेमींना आहे.
गावांना मिळणाऱ्या पुरस्कारांमध्ये वणवामुक्तीसाठी काही गुण निर्धारित करण्यात आले तर गाव पातळीवर वणवा रोखणं अधिक सोपं जाईल. जिल्ह्यात सुमारे १४०० चौरस किलोमिटर वनक्षेत्र आहे. शिवय डोंगरी भाग मोठ्याप्रमाणात आहे. फेब्रुवारीच्या मध्यावर या डोंगरांवर सायंकाळच्या वेळी वणवे दिसू लागतात. एका अहवालानुसार जिल्ह्यात गेल्या दिड महिन्यात १५० हून अधिक ठिकाणी वणवा लावण्याचे प्रकार घडले. खासगी मालकी क्षेत्रात लावलेला वणवा पुढे तोच वनक्षेत्रापर्यंत पोहोचतो. त्यामुळे हे वणवे विझवण्यासाठी वनकर्मचा-यांना धावाधाव करावी लागते.
डोंगर उतार, अडचणीचे ठिकाण, वणवा पसरण्यास अनुकूल परिस्थिती, पाण्याची वाणवाच अशा विचित्र परिस्थितीशी सामना करत वनकर्मचारी अपु-या मनुषचयबळानिशी या वणव्याशी झुंजतात. रोज वेळी-अवेळी हा विस्तवाशी खेळ सुरु असतो. संवर्धन, संगोपण, कोर्ट केसेस, गुन्ह्यांचा तपास, इतर कार्यालयीन व प्रशासकीय काम करत असताना ही कामे हातची टाकून त्यांना पळावं लागतं. शिवाय वणव्यात लाखमोलाच्या वनस्पती, वृक्ष, वन्यजीवांचं नुकसान होतं ते वेगळचं!
वणवा कोण लावतो याचा गाव पातळीवर स्थानिकांना अंदाज असतो. वनविभागाने अशा लोकांना बोलावून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्यास मोठ्या प्रमाणात अशा अघोरी प्रकारांना आळा बसू शकेल. शेतकरी या दिवसात बांध पेटवुन निघून जातात. हीच आग वनक्षेत्रात पसरते. त्यामुळे शेतक-यांनी बांधपेटवताना तो विझेपर्यंत काळजी घेतल्यास वणव्याला आळाबसू शकेल. वणव्याच्या धगीमुळे वन्यजीव सैरभैर होऊन ते चुकून मानवी वस्तीत येतात. त्यातून मानव-वन्यजीव संघर्षाचा धोका वाढतो.
वणव्याची जबाबदारी गावाकडे द्यावी
वनवा विझवण्याबरोबरच तो लागूच नये यासाठी अधिक जोरकसपणे प्रयत्न व्हायला हवेत. साता-याचे वन्यजीव रक्षक सुनील भोईटे या संदर्भात बोलताना म्हणाले, गावात कोण वणवा लावतो, याची माहिती स्थनिक पातळीवर पोलिस पाटील किंवा तत्सम यंत्रणेला असते. ग्रामस्वच्छता अभियानासारख्या लोकसहभागाच्या स्पर्धांमध्ये स्वच्छता, वैयक्तिक शौचालय, कु-हाड बंदी याबरोबरच गावच्या हद्दीत वणवा लागू न देण्याच्या निकषाचा समावेश करावा. जेणे करुन स्थानिक पातळीवरच वणवा लावणा-यांना प्रतिबंध बसेल तसेच एखाद्याने आगाउपणा केल्यास त्यांना शोधून केसेस दाखल करणे सोईचे होईल.
ब-याच वेळा वनक्षेत्रापासून एक-दीड किलोमिटरवर वणवा लावला जातो. वनक्षेत्रात तो येऊ नये म्हणून कर्मचा-यामार्फत विझवलाही जातो. मात्र वणवा लावल्याचे ठिकाण अज्ञात राहिल्याने तपासाला थोडा वेळ लागतो. यंत्रणेला याची माहिती मिळून तिथं यंत्रणा राबेपर्यंत वणव्याची धग वाढलेली असते. परिणामी वनक्षेत्राची अपरिमित हानी होते.
- शितल राठोड,
वनक्षेत्रपाल, सातारा
गावांमध्ये जलसंधारणाचे कामं सुरू असताना बंधारा बांधण्यासाठी स्थानिकांनी वेळ आणि श्रम खर्ची घातलेले असतात. वणवा लागून जमीन पोकळ होऊन जर मातीचा थर बंधाऱ्यात जाणार असेल तर त्या केलेल्या कष्टाचा काय उपयोग? त्यामुळेच स्थानिक पातळीवरच पुरस्कारांच्या निकषात वणवामुक्तीसाठी काही गुण गावांना मिळाले तर वणवामुक्ती शक्य होईल.
- सुनिल भोईटे,
मानद वन्यजीवरक्षक, सातारा