अटकेच्या भीतीने संजय राऊत बेळगावला जात नाहीत, मंत्री शंभूराज देसाईंचा टोला

By नितीन काळेल | Updated: December 8, 2022 16:20 IST2022-12-08T16:19:59+5:302022-12-08T16:20:42+5:30

'सरकारच्या विरोधात कोण भडकवतंय ? याची चौकशी करावी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोललो'

Sanjay Raut is not going to Belgaum for fear of arrest, Minister Shambhuraj Desai entourage | अटकेच्या भीतीने संजय राऊत बेळगावला जात नाहीत, मंत्री शंभूराज देसाईंचा टोला

अटकेच्या भीतीने संजय राऊत बेळगावला जात नाहीत, मंत्री शंभूराज देसाईंचा टोला

सातारा : जेलमध्ये साडे तीन महिने आराम करुन संजय राऊत बाहेर आले आहेत. जामिनावर असले तरी ते निर्दोष सुटल्यासारखे छाती बडवून घेत आहेत. अशावेळी आम्ही बेळगावला गेलो नाही म्हणून षंढ म्हणतात. पण, तेच अटक होईल, जेलमध्ये टाकतील या भीतीने बेळगावला जात नाहीत. त्यामुळे त्यांनी दुसऱ्याला षंढ का म्हणावे,’ असा जोरदार टोला उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला. 

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री देसाई बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. देसाई म्हणाले, ‘जेलमधून आल्यानंतर राऊत यांचा मी ठाकरे गटात किती सक्रिय आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे ते टीका करत आहेत. ते जेलमध्ये सामाजिक किंवा लोकांच्या प्रश्नावर गेले नव्हते. त्यांना अटक झाली ती पत्रा चाळीतील गैरप्रकारात. ते म्हणतात मला जेलमध्ये जायची सवय आहे. त्यांची वाचाळ बडबड ही निर्दोष सुटल्यासारखी आहे. 

बेळगावला गेलो नाही म्हणून राऊत टीका करतात. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० दिवस तुरुंगवास भोगला. छगन भुजबळही गेले होते. संजय राऊत बेळगावप्रश्नी चार दिवसतरी जेलमध्ये गेले का? त्यांच्याकडून वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

मुंबईचे पोलिस सतत्या बाहेर काढतीलच

दररोज बाह्या मागे सारत संजय राऊत माध्यमांसमोर येतात, वाचाळ बडबड करतात. सकाळची ही बडबड बंद करावी, असे सांगून मंत्री देसाई पुढे म्हणाले, ‘राऊत म्हणतात मला धमकीचे फोन आले. हे माध्यमांसमोर सांगायला त्यांना २४ तास लागलेत. त्यांनी त्वरित पोलिसांना का सांगितले नाही. याबाबत मुंबईचे पोलिस सतत्या बाहेर काढतीलच.

माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्नाटकची भूमिका योग्य आहे असे वक्तव्य केल्याबाबतचा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर देसाई यांनी भरणे हे काय बोलले हे मी एेकले नाही. पण, त्यांनी राज्याच्या हिताची भूमिका घ्यावी, असे स्पष्टपणे सांगितले. 

बेळगावला नक्कीच जाणार

सीमाभागातील ८५० गावांच्या सुविधा बंद होत्या. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या सुरु केल्या. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एक-एक पाऊल पुढे टाकत आहेत. सीमाभागातील लोकांनाही बाहेर जायचं नाही. त्यांचे समाधान झालेले आहे. पण, सीमाभागातील लोकांना जाणीवपूर्वक हे कोण करायला लावत आहे. सरकारच्या विरोधात कोण भडकवतंय ? याची चौकशी करावी असे मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे, असे मंत्री देसाई यांनी सांगितले. 

अमित शहांना भेटणार 

कर्नाटकविषयी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. आम्ही वातावरण शांत करत आहोत. त्यांना कोठेही जाण्याची गरज नाही. महाराष्ट्र-कर्नाटक वाहतूक सुरळीत आहे. तसेच सीमाप्रश्नी शिंदे गटाचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

गुजरातचा निकाल देशाला दिशा देईल

मी बेळगावला नक्की जाणाार आहे. पण, कसं जायचं हे बघू असे मंत्री देसाई यांनी सांगितले. त्याचबरोबर गुजरात विधानसभा निवडणूक निकाल देशाला दिशा देईल. २०२४ मध्येही देशात आणि राज्यात विकास करणारे आमचेच सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 

Web Title: Sanjay Raut is not going to Belgaum for fear of arrest, Minister Shambhuraj Desai entourage