गोरगरिबांची धावपळ : गाडीभर लुंग्यांतून मिळते मापटंभर धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 14:31 IST2020-10-08T14:29:17+5:302020-10-08T14:31:27+5:30
farmar, farming, satatranews, phalthan, फलटण तालुक्यात बाजरी काढणी, मळणीची लगबग सुरू आहे. बाजरी मळताना मशीनच्या पुढे लुंग्या उडून जातात. त्यातून धान्य गोळा करण्यासाठी गाडीभर लुंग्यांतून मापटंभर धान्य मिळते. त्यातून महिन्याभरात चार पोती गोळा करून गरीब, मजूर लुंग्यातून चारितार्थ चालवत आहेत.

गोरगरिबांची धावपळ : गाडीभर लुंग्यांतून मिळते मापटंभर धान्य
आदर्की : फलटण तालुक्यात बाजरी काढणी, मळणीची लगबग सुरू आहे. बाजरी मळताना मशीनच्या पुढे लुंग्या उडून जातात. त्यातून धान्य गोळा करण्यासाठी गाडीभर लुंग्यांतून मापटंभर धान्य मिळते. त्यातून महिन्याभरात चार पोती गोळा करून गरीब, मजूर लुंग्यातून चारितार्थ चालवत आहेत.
फलटण तालुक्यात खरीप हंगामात बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे उत्पादन चांगले निघाले आहे. बाजरीची मळणी करताना मशीनमध्ये कणसे टाकल्यानंतर चांगली बाजरी पोत्यामध्ये येते तर हलकी बाजरी लुंग्याबरोबर पुढे जाते. शेतकरी पुढे गेलेल्या लुंग्या परत मशीनमध्ये टाकली तरी लुंग्यासह बाजरी पुढे जाते. चार पोती बाजरी झाली तर ट्रॉलीभर लुंग्या निघतात.
सर्व लुंग्या बडवून, पाकडून, वाढवून एक ते दोन पायली बाजरी मिळते. त्यासाठी महिला-पुरुषांचे दोन-तीन तास जातात. त्यामध्ये धान्य मिळते; पण गरीब कष्टकरी मजुरांना शेती नसली तरी लुंग्यातून दोन महिन्यांत तीन ते चार पोती बाजरी मिळते. त्यातून पोटाची खळगी कशीबशी भरत असल्याचे ग्रामीण भागात दिसत आहे.
आले ते पदरात पाडण्याचा प्रयत्न
फलटण तालुक्यात बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात केले जाते. पण काढणी, मळणीच्या वेळी पाऊस असतो. त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडते. त्यामुळे हाती आले ते पदरात पाडायचा प्रयत्न केला जातो. पण त्यासाठी लुंग्यांतील बाजरीचा विचार केला जात नाही.