कऱ्हाड : कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यावरील आगाशिवनगर परिसरात सतत रहदारी असते. त्यामुळे मार्गावर जिथे दुभाजक आहेत, त्याठिकाणी गतिरोधक लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गतिरोधक नसल्यामुळे अनेक वाहने भरधाव वेगाने धावत असतात. यावेळी नेहमी अपघात होत असतात. याची बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन गतिरोधक बसवण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गटारींची दुरवस्था
कऱ्हाड : पालिकेच्या आवारात अंतर्गत रस्त्यांच्या कडेला असलेल्या भाजी मंडई परिसरात अनेक ठिकाणी गटारींची दुरवस्था झाली आहे. पाणी तुंबल्याने परिसरात अस्वच्छतेमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे मंडईतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जनावरांमुळे त्रास
कऱ्हाड : शहरातील बसस्थानक, भाजी मंडई, विजय दिवस चौक परिसरात मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांनाही या जनावरांचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच मंडईमध्ये जनावरांची वर्दळ वाढत आहे. पालिकेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
पहाटे व्यामासाठी गर्दी
(०७इन्फोबॉक्स०२)
कऱ्हाड : गत दोन दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच युवक पहाटे व्यायामासाठी गर्दी करीत आहेत. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमसह शिवाजी हौसिंग सोसायटीतील रस्ते नागरिकांच्या गर्दीने फुलून जात आहेत. तसेच उपनगरांतील रस्त्यांवरही पहाटे व्यायाम करणाऱ्यांची गर्दी होत आहे.