बेरजेच्या गणितांसाठी नारजांच्या मनधरणीचा अखेरचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST2021-06-16T04:51:38+5:302021-06-16T04:51:38+5:30

माणिक डोंगरे कृष्णाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज काढून घेण्याची मुदत गुरुवारी १७ रोजी संपत आहे. २१ जागांसाठी तब्बल २१३ अर्ज ...

The last day of Naraj's mind for Berje's mathematics | बेरजेच्या गणितांसाठी नारजांच्या मनधरणीचा अखेरचा दिवस

बेरजेच्या गणितांसाठी नारजांच्या मनधरणीचा अखेरचा दिवस

माणिक डोंगरे

कृष्णाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज काढून घेण्याची मुदत गुरुवारी १७ रोजी संपत आहे. २१ जागांसाठी तब्बल २१३ अर्ज रिंगणात आहेत. इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे अर्ज काढण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला प्रत्येकी २१ उमेदवार ठेवावे लागणार असल्यामुळे अर्ज माघारीपर्यंत नाराजांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीनही पॅनेलच्या नेत्यांना बेरजेच्या राजकारणाची गणिते सोडवताना नाराजांची मनधरणी करावी लागत आहे.

यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे कार्यक्षेत्र कराड दक्षिण आणि वाळवा तालुक्याबरोबरच कडेगाव, शिराळा आणि कराड उत्तर असे पाच तालुक्यांत असले तरी कृष्णेचे बहुतांश सभासद हे कराड दक्षिण आणि वाळवा तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहेत. कारखान्याच्या २१ जागांसाठी तब्बल ३०५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. येथील बाजार समितीच्या सभागृहात त्यांची छाननी झाली. त्यात दुबार अर्ज दाखल झालेले ७० जणांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. त्यानंतर झालेल्या छाननीत सलग तीन वर्षे ऊस न घालणे, कर्ज थकीत ठेवणे अशा विविध कारणांनी २२ जणांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले.

कारखान्यासाठी छाननीनंतर रेठरे बुद्रुक-शेणोली गटात २८, वडगाव हवेली- दुशेरे ४५, रेठरे हरणाक्ष-बोरगाव ४७, कार्वे-काले ४३, नेर्ले-तांबवे गटातून ३२, येडेमच्छिंद्र-वांगी गटातून २०, महिला राखीवसाठी ३३, अनुसूचित जाती जमाती गटातून १७, अर्ज विमुक्त जाती भटक्‍या जमाती गटात १२ व इतर मागास राखीव गटात १२ अर्ज दाखल आहेत. त्यामुळे निवडणूक रिंगणात २१ जागांसाठी तब्बल २१३ उमेदवार राहिले आहेत. म्हणजे तिरंगी लढत झाल्यास गटनिहाय सरासरी ९ ते १० उमेदवार असणे अपेक्षित असते. मात्र, सध्या तिपटीहून अधिक उमेदवारी अर्ज असल्यामुळे माघार कोणाला घ्यावी लागणार यावरून सर्वच पॅनेलमध्ये नाराजी नाट्य घडण्याची शक्यता आहे. ठरलेला उमेदवारी अर्ज ठेवून उर्वरित इच्छुकांची मनधरणी करण्याचे मोठे आव्हान त्या त्या पॅनेलच्या नेत्यांपुढे आहे. तर काही ठिकाणी नवीन सभासदांना संधी देण्यासाठी मूळ कार्यकर्त्यांचे तिकीट कापल्यामुळे नाराज इच्छुक कार्यकर्त्यांचा तिढा सोडवण्याचे आव्हानही नेत्यांपुढे आहे. त्यामुळे सध्या अर्ज माघारीसाठी शेवटचे दोन दिवस राहिले आहेत. फोडाफोडी आणि दबावाच्या राजकारणाला वेग येण्याची शक्यता आहे. शेवटच्या दोन दिवसांत अर्ज काढून घेण्यासाठी सर्वच नेत्यांना कसरत करावी लागत आहे.

चौकट

नाराज कार्यकर्ते सैराट होण्याची भीती

कृष्णाच्या निवडणुकीत सहकार पॅनेल सत्ताधारी असल्यामुळे त्यांच्याकडेही इच्छुकांची संख्या जास्त आहे. अर्ज काढून घेण्यावरून त्यांच्यातही नाराजीचा सूर लागण्याची शक्यता आहे. ते नाराज कार्यकर्ते थोपवण्यात नेत्यांना कितपत यश येते हे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच मोहिते मनोमिलन होणे हे सध्यातरी धूसरच दिसत आहे. काही करिष्मा घडून जर मनोमिलनातून एकत्र आले तर त्या त्या गटातील इच्छुकांना अपेक्षित उमेदवारी न मिळाल्यामुळे काही जण इतरत्र जातील, तर काही जण अपक्ष लढतील. जरी नेते एकत्र आले तरी दोन्ही पॅनलमधील काही कार्यकर्ते सैराट झाल्याचे चित्र दिसेल.

Web Title: The last day of Naraj's mind for Berje's mathematics