कोयनेत ६७ टीएमसी साठा, सांगलीची सिंचन मागणी वाढली; ३१ मेपर्यंत पाणी पुरवावे लागणार 

By नितीन काळेल | Published: February 20, 2024 07:18 PM2024-02-20T19:18:01+5:302024-02-20T19:18:54+5:30

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात ६७ टीएमसी साठा असून पाण्याची मागणी सतत होत आहे. त्यातच आता सांगली ...

Koyna dam 67 TMC storage, Sangli irrigation demand increased | कोयनेत ६७ टीएमसी साठा, सांगलीची सिंचन मागणी वाढली; ३१ मेपर्यंत पाणी पुरवावे लागणार 

कोयनेत ६७ टीएमसी साठा, सांगलीची सिंचन मागणी वाढली; ३१ मेपर्यंत पाणी पुरवावे लागणार 

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात ६७ टीएमसी साठा असून पाण्याची मागणी सतत होत आहे. त्यातच आता सांगली पाटबंधारे विभागाकडूनही सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्याने धरणाच्या आपत्कालिक द्वारमधून ५०० क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या सांगलीसाठी पायथा वीजगृह २१०० आणि द्वारमधील ५०० असा एकूण २६०० क्यूसेकने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सर्वाधिक धरणे आहेत. कोयना, धोम, बलकवडी, तारळी, कण्हेर, उरमोडी अशी काही मोठी धरणे आहेत. या धरणांची पाणीसाठवण क्षमता सुमारे १४८ टीएमसी इतकी आहे. दरवर्षी जून ते सप्टेंबरपर्यंतच्या पावसाळ्यात ही धरणे भरतात. त्यामुळे वर्षभराचे सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करता येते. मात्र, गेल्यावर्षी जिल्ह्यातच पर्जन्यमान कमी झाले. वार्षिक सरासरीच्या ७० टक्क्यांहून कमी पाऊस पडला. त्यातच कोणत्याही तालुक्याने १०० टक्केचा टप्पाही गाठला नाही. त्यामुळे गेल्यावर्षी आॅक्टोबरपासूनच जिल्ह्यात पाणीटंचाई आहे. तर पाऊस कमी पडल्याने कोयनेसह मोठी धरणे भरली नाहीत. मात्र, या धरणांवर विविध सिंचन योजना अवलंबून आहेत. तसेच शेकडो गावांची तहानही भागत आहे. त्यामुळे सध्या कोयनेतील पाण्यासाठी मागणी वाढली असल्याने विसर्ग करावा लागत आहे.

कोयना धरणातून सांगलीसाठी पाणी सोडण्यात येत होते. पायथा वीजगृहाची दोन्ही युनीट सुरू करुन २१०० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते. पण, सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी जादा पाणी सोडण्याची मागणी झाली. त्यामुळे मंगळवारी दुपारी १२ वाजल्यापासून धरणाचे आपत्कालिन द्वार खुले करण्यात आले. त्यातून ५०० क्यूसेक वेगाने सांगलीसाठी पाणी सोडण्यास सुरूवात झाली आहे. या कारणाने आता सांगलीसाठी २६०० क्यूसेकने पाणी सोडले जात आहे. हे सर्व पाणी कोयना नदीपात्रात जात आहे. सांगलीसाठी आणखी काही दिवस काेयनेतून विसर्ग सुरू राहील, अशी माहिती मिळत आहे.

३१ मेपर्यंत पाण्याचे नियोजन करावे लागणार..

कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. गेल्यावर्षी धरण ९५ टीमएसीपर्यंतच भरले होते. सध्या धरणात ६७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी ३१ मेपर्यंत पुरवावे लागणार आहे. या धरणातील पाण्यावर महत्वाच्या तीन सिंचन योजना अवलंबून आहेत. टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या सिंचन योजनांचा समावेश आहे. या योजनांसाठी पाणी विसर्ग करण्यात येतो. त्यातून शेकडो हेक्टर शेतीला फायदा होतो.

Web Title: Koyna dam 67 TMC storage, Sangli irrigation demand increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.