'गुरुजीं'चीच झाली परीक्षा!, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यात 'या' खासगी संस्थेने राबवला पहिलाच प्रयोग
By प्रमोद सुकरे | Updated: June 11, 2025 13:47 IST2025-06-11T13:47:06+5:302025-06-11T13:47:47+5:30
सुमारे १७५ जणांनी दिला पेपर

'गुरुजीं'चीच झाली परीक्षा!, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यात 'या' खासगी संस्थेने राबवला पहिलाच प्रयोग
प्रमोद सुकरे
कऱ्हाड : नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची काटेकोर अंमलबजावणी राज्यात टप्प्या-टप्प्याने सुरू झालेली आहे. नवीन शिक्षण धोरणाचे हे आव्हान पेलण्यासाठी येथील शिक्षण मंडळाच्यावतीने गेल्या वर्षभरात शिक्षकांसाठी अनेक चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून नुकतीच शिक्षण मंडळाच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांची नुकतीच परीक्षा घेण्यात आली. या परिक्षेला संस्थेतील १७५ शिक्षक या सामोरे गेले. संस्थेच्या या उपक्रमाचे शैक्षणिक वर्तुळात कौतुक होत आहे.
सर्वसमावेशक, गुणवत्तापूर्ण, बहुभाषिकता, कौशल्य विकसन, व्यवसाय शिक्षणाचा अंतर्भाव, परिवर्तित शिक्षणाचा आकृतीबंध आदी वैशिष्ट्ये असलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची काटेकोर अंमलबजावणी राज्यात टप्प्या-टप्प्याने सुरू झालेली आहे. हे धोरण शाश्वत विकासाच्या ध्येयांशी जोडले गेलेले आहे.त्यामुळेच या नवीन शिक्षण धोरणाचे आव्हान पेलण्यासाठी शिक्षक सक्षम झाले पाहिजेत म्हणून शिक्षण मंडळाच्यावतीने या परिक्षेचे नियोजन करण्यात आले.
नवीन शिक्षण धोरणाची योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी, शिक्षकांची मानसिकता जाणण्याच्या दृष्टीने संस्थेने राबविलेल्या “ गुरुजींची परीक्षा ” या उपक्रमास शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाच. शिवाय अशा परीक्षांची उपयुक्तताही बोलून दाखविली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
ही जिल्ह्यातील एकमेव संस्था असावी
सातारा जिल्ह्यामध्ये अनेक खासगी शिक्षण संस्था कार्यरत आहेत. पण नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संस्था स्तरावर व्याख्याने, प्रशिक्षणे घेणारी व शिक्षकांनी त्यातून काय घेतले हे जाणून घेणा्यासाठी शिक्षकांची परिक्षा घेणारी जिल्ह्यातील कराड शिक्षण मंडळ ही एकमेव संस्था असावी. यातून इतर शिक्षण संस्थानी बोध घेतला तर नवीन शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबवणे सुलभ होईल.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन स्तरावर तर प्रयत्न सुरू आहेतच. पण आम्ही आमच्या संस्था स्तरावर देखील शिक्षकांची प्रशिक्षणे घेतली. तज्ञांचे मार्गदर्शन घडवून आणले. या सगळ्या मधून आमच्या शिक्षकांनी नेमके किती आणि काय आत्मसात केले? हे समजून घेण्यासाठी आम्ही त्यांची ही परीक्षा घेतली.त्याला शिक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. - अनघा परांडकर, उपाध्यक्षा, शिक्षण मंडळ कराड