Satara: बावधनच्या विठ्ठल कदम यांना बगाड्याचा मान, ८ मार्चला बगाड यात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 15:56 IST2026-03-04T15:56:01+5:302026-03-04T15:56:13+5:30
परंपरेचे घडणार दर्शन

Satara: बावधनच्या विठ्ठल कदम यांना बगाड्याचा मान, ८ मार्चला बगाड यात्रा
बावधन : संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या बावधनच्या (ता.वाई) काळभैरवनाथाच्या यात्रेतील परंपरागत आणि वैशिष्ट्यपूर्ण बगाड मिरवणूक येत्या रविवारी (दि. ८) रंगपचमीला निघणार आहे. या वर्षी बगाड्याचा मान बावधन येथील शेतकरी विठ्ठल सोपान कदम यांना मिळाला आहे.
बावधन येथे दरवर्षी फाल्गुन महिन्यात तीन दिवस ग्रामदैवत काळभैरवनाथाची यात्रा भरते. यात्रेत भैरवनाथाचा विवाह सोहळा, छबिना, बगाड मिरवणूक असे कार्यक्रम होतात. देवाला केलेल्या नवसाची परतफेड करण्यासाठी बगाड घेण्याची प्रथा आहे. होळी पौर्णिमेच्या दिवशी रात्री १२ नंतर बगाड्या ठरविण्यासाठी मंदिरातील पुजारी देवास पारंपरिक पद्धतीने कौल लावत असतात. या वर्षी एकूण ६१ नवसकरी नवस फेडण्यासाठी बसले होते. यातील ३७व्या क्रमांकावर असलेल्या विठ्ठल सोपान कदम यांच्या बाजूने देवाने कौल दिल्याने यंदाचा बगाड्या होण्याचा मान कदम यांना मिळाला आहे.
बगाड्या यांनी त्यांचे थोरले बंधू रवींद्र सोपान कदम यांची प्रकृती सतत बिघडत असल्याने, त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी २०१० साली नाथांच्या चरणी नवस केला होता. तो पूर्ण झाल्यानंतर विठ्ठल कदम हे २०१३ पासून कौल घेण्यासाठी बसत होते. या वर्षी बगाड्या होण्याचा मान त्यांना मिळाला. त्यामुळे संपूर्ण बावधन पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे. कौल मिळाल्यानंतर काशीनाथाचं चांगभलं, असा गजर करत बगाड्याच्या नावाची घोषणा करून बगाड्याने मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घातल्या. विठ्ठल कदम हे प्रगतशील शेतकरी आहेत.
माझ्या मोठ्या भावाची प्रकृती सतत खालावत होती. ती सुधारण्यासाठी मी नाथांच्या चरणी २०१० साली नवस केला होता आणि तो पूर्ण झाला. त्यामुळे मी २०१३ पासून कौल घेण्यासाठी बसत होता. आज हा कौल मला मिळाला. त्यामुळे मी खूप समाधानी आहे आणि मी हे बघाड आनंदाने गावापर्यंत आणीन. - विठ्ठल कदम, बगाड्या