इंधन दरवाढीवर इलेक्ट्रिक वाहनांचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:47 AM2021-09-16T04:47:59+5:302021-09-16T04:47:59+5:30

पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले होते. लॉकडाऊनमध्ये हाताला काम नव्हतं. अशात तांबवे येथील तरुणांच्या डोक्यात कल्पना आली. विजेवर ...

Exit of electric vehicles on fuel price hike | इंधन दरवाढीवर इलेक्ट्रिक वाहनांचा उतारा

इंधन दरवाढीवर इलेक्ट्रिक वाहनांचा उतारा

Next

पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले होते. लॉकडाऊनमध्ये हाताला काम नव्हतं. अशात तांबवे येथील तरुणांच्या डोक्यात कल्पना आली. विजेवर चालणारी सायकल बनविली तर अन् अनेक प्रयोग करत त्यांनी ‘मेड इन तांबवे’ इलेक्ट्रिक सायकल बनविली. याच काळात इलेक्ट्रिक वाहनांनी बाजारपेठेत एन्ट्री केली आहे. अगदी इलेक्ट्रिक एसटीही आणण्यासाठी चाचपणी सुरू आहे. अनेक तरुण या व्यवसायासाठी निगडित जोडधंद्यांकडे वळू लागले आहेत.

- जगदीश कोष्टी

उपसंपादक, सातारा

‘गरज ही शोधाची जननी’ असते असे म्हटले जाते, याचा प्रत्यय सातारकरांना वारंवार येत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वी सर्व काही अलबेल सुरू होते. प्रत्येकाचा आपापल्या व्यवसायात, नोकरीत जम बसला होता. त्यामुळे काही तरी नवीन करण्याचा कोणी फार विचारच करत नव्हता. सालाबादप्रमाणे पगार वाढत होता. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंबरोबर मौजमजेच्या वस्तूंचा वापरही तितकाच वाढला होता.

देशभरात साधारणतः मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि सुरुवातीस जनता कर्फ्यू त्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. सुुरुवातीचे काही दिवस सर्वच सातारकरांना गमतीचाच प्रकार वाटला. खाणं, पिणं आणि मस्त आराम करणे एवढेच सुरू होते. मात्र त्याचे दुष्परिणाम काही महिन्यांनंतर जाणवू लागले. उद्योगधंदे, दळणवळण ठप्प असल्याने अनेक कंपन्यांच्या मालकांनी टाळे लावले. कामगारांना घरी थांबण्याचे फतवे काढण्यात आले. त्यामुळे सुशिक्षित तरुणांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. अनेक परप्रांतीय कारागिरांनी परतीचा मार्ग अवलंबला. जथ्थेच्या जथ्थे विस्तापित होत असताना पाहणे काळीज पिळवटून टाकणारे होते.

एकीकडे हे सुरू असल्याने उत्पन्नाचे स्त्रोत घटत चालले होते. आणि पेट्रोल डिझेलच्या दराने आकाशाला गवसणी घालण्यासाठी जणू स्पर्धाच लावली होती. लॉकडाऊन काळात काहीजण या परिस्थितीवर प्रचंड चीड व्यक्त करत होते. पण त्याच काळात लॉकडाऊनमधील कामापासून सक्तीची विश्रांती मिळालेल्या तांबवेतील अतुल आणि अनिल या भावंडांनी विद्युत बॅटरीवर चालणारी सायकल तयार केली. लहानपणी मंडळातील देखाव्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विद्युत माळा दुरूस्तीचा अनुभव गाठीशी होता. याचाच वापर त्यांनी यात केला. सायकलच्या पाठीमागील चाकात मोटार बसविली. त्याचप्रमाणे सेंन्सरचे ब्रेक बसविले. त्यांचं जुगाड चांगलंच जुळलं होतं. एकदा चार्ज केल्यावर साधारणतः शंभर किलोमीटर सायकल धावू शकते असा अतुल आणि अनिल या भावंडांचा दावा आहे. विशेष म्हणजे लांबच्या प्रवासात यदाकदाचित बॅटरी डाऊन झालीच तर आपली जुनी पुराणी पायंडल मारुन धावणारी सायकल सेवेला असते.

लॉकडाऊननं माणसांना खर्च कमी करावा. जे आहे ते शास्वत नाही. याचा विचार करायला शिकवलं. त्यामुळेच गेल्या दीड वर्षांपासून साताऱ्याच्या बाजारपेठेत विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांनी प्रवेश केला आहे. त्यांचा वापरही तितकाच वाढलेला आहे. या गाड्यांमध्ये प्रत्येक कंपनी काही ना काही नवीन फिचर देण्याचा प्रयत्न करत आहे. तरुणाईला आवडेल असा लूक देण्यात आला आहे. आणि त्या सातारकरांच्या पसंतीस उतरत आहेत.

इलेक्ट्रिक दुचाकींचा वापर प्रामुख्याने गृहिणींसाठी शाळा-महाविद्यालय, बँकेत काम करणारे, मुलांना खासगी क्लास, शाळेत सोडण्याचे काम करणाऱ्या गृहिणींमधून वाढला आहे. पेट्रोलसाठी खर्च करण्याऐवजी कमी खर्चात शहरात प्रवास करण्यासाठी गृहिणींना चांगले साधन मिळाले आहे.

Web Title: Exit of electric vehicles on fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.