पर्यावरण दिन विशेष: जाई प्लास्टिक पोटात; पचन बिघडून पशुधन धोक्यात
By जगदीश कोष्टी | Updated: June 5, 2025 12:50 IST2025-06-05T12:50:06+5:302025-06-05T12:50:30+5:30
प्लास्टिकचा अतिवापरामुळे ग्लोबल वॉर्मिंगसारख्या समस्या भेडसावत आहेत

पर्यावरण दिन विशेष: जाई प्लास्टिक पोटात; पचन बिघडून पशुधन धोक्यात
जगदीश कोष्टी
सातारा : बदलत्या काळानुसार माणसाची जीवनशैली सुधारली; पण आचारण बिघडत गेेले. घरातील शिळ्या भाकरी, चपाती, भाज्यांची देठे पूर्वी थेट जनावरांसमोर टाकले जात; पण आता शहराबरोबरच ग्रामीण भागातही प्लास्टिकमधून आणून रस्त्याच्या कडेला टाकले जातात. हे अन्न खाताना अनेकदा जनावरांच्या पोटात प्लास्टिक जाते. मात्र, त्याचे पचन व्यवस्थित न झाल्याने पुढे पचनसंस्था बिघडते. त्यावर वेळीच उपचार न झाल्यास जनावरे दगावण्याचाही धोका संभवतो.
सातारा जिल्ह्याला निसर्गाचे वरदान भरभरून लाभले आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगा, घनदाट झाडीमुळे विपुल वनसंपदा लाभली आहे. त्यातच कास पुष्प पठार, महाबळेश्वरचा निसर्ग जगभरातील पर्यटकांना साद घालत असतो. त्याचबरोबर हा भाग पर्यावरणीयदृष्ट्या खूपच संवेदनशील आहे; पण गेल्या काही वर्षांपासून या पर्यावरणाला गालबोट लावले जात आहे.
प्लास्टिकचा अतिवापर हा याला कारणीभूत ठरत आहे. प्लास्टिकचे विघटन होत नाही. कित्येक वर्षे ते तसेच राहते. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगसारख्या समस्या भेडसावत आहेत. त्याचबरोबर सजीवनांही धोका संभवत आहे. तो टाळण्यासाठी प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध आणणे आवश्यक आहे.
रवंथ करता येत नाही
जनावरे दिवसभर भराभर चारा खात असतात. हा चारा त्यांच्या मोठ्या जठरात साठते. त्यानंतर रात्रभर ते हाच तोंडात आणून रवंथ करत राहतात. प्लास्टिक वजनाला हलके असल्याने ते जठराच्या खाली बसते. त्यामुळे रवंथ करण्यासाठी तोंडात परत येत नाही.
काही दिवसांत बनतात कडक
हे प्लास्टिक वारंवार खाण्यात आले तर काही दिवसांनी मोठ्या जठरात ते दगडासारखे कडक होते. नंतर ते पुढील आतड्याच्या तोंडाला अडकते. त्यामुळे पोट फुगल्यासारखे वाटते. त्यामुळे जनावर चारा खात नाही. पुढे पचनसंस्था बिघडल्यामुळे जनावर दगावण्याचा धोका असतो.
शेतकऱ्यांच्या जीवनात पशुधनाला फार मोठे स्थान असते. मात्र, माणसांच्या दुर्लक्षामुळे जनावरांच्या खाण्यात प्लास्टिक जात असल्याने ते दगावतात. ही बाब आपणाला परवडणारी नाही. - डॉ. महेश लकडे, पशुधन विकास अधिकारी
कोकणात फिरायला गेलो असता समुद्रकिनारी एक पक्षी वरखाली जात होता. यावेळी लक्षात आले की, त्या पक्ष्याच्या गळ्यात प्लास्टिक बाटलीचे झाकण अडकले होते. ही घटना पाहून मनात घालमेल सुरू झाली अन् साताऱ्यात आल्यावर सागरमित्र अभियान ही संस्था स्थापन केली. यामध्ये साताऱ्यातील घर, सोसायटीत जाऊन आम्ही प्लास्टिक संकलन करत असतो. - सोहम कुलकर्णी, सातारा.