पाटण रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण,चालक त्रस्त, दुरवस्थेमुळे अपघाताची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 15:17 IST2017-11-09T15:10:41+5:302017-11-09T15:17:40+5:30
कऱ्हाड -पाटण मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. ठिकठिकाणच्या धोकादायक खड्ड्यांमुळे अनेक अपघातही झाले आहेत. मात्र, तरीही संबंधित विभागाकडून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

पाटण रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण,चालक त्रस्त, दुरवस्थेमुळे अपघाताची भीती
तांबवे ,दि. ९ : कऱ्हाड -पाटण मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. ठिकठिकाणच्या धोकादायक खड्ड्यांमुळे अनेक अपघातही झाले आहेत. मात्र, तरीही संबंधित विभागाकडून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
कऱ्हाड-पाटण रस्ता हा पूर्वी राज्यमार्ग होता. काही महिन्यांपूर्वी या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. या रस्त्यावर कऱ्हाड ते विजयनगर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयापर्यंत चौपदरीकरण झाले आहे. तेथून पुढे रस्त्यावर अनेक मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी या खड्ड्यांची रुंदी दोन ते पाच फुटांपर्यंत आहे.
अनेक वर्षांपासून या रस्त्याची साधी डागडुजीही केली गेली नाही. या रस्त्यावर वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. हा रस्ता कोकणला जोडणारा मुख्य रस्ता असल्याने या मार्गावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालू असते.
पाऊस पडला तर रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचते. परिणामी, खड्ड्याचा अंदाज न आल्याने अनेक अपघात होतात. सुपने गावापासून विहे गावापर्यंतच्या रस्त्यावर लहान-मोठे शेकडो खड्डे पडले आहेत.
याबाबत अनेकवेळा बांधकाम विभागाला निवेदन देऊन ग्रामस्थ वैतागले आहेत. तरीही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच हा रस्ता चौपदरीकरण करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधीचा निधी मिळाला असल्याचीही चर्चा आहे. मात्र, त्याबाबत कोणतीच कार्यवाही होताना दिसत नाही.
सध्या चिपळूण ते पंढरपूर या पूर्वीच्या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच रस्त्याच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभाग लक्ष देणार नाही. परिणामी वाहनधारकांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागण्याची चिन्हे आहेत. संबंधित विभागाने या रस्त्याची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.