खटाव : कोरोना विषाणूमुळे ग्रामीण भागातील बँड व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत. तर या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या काही कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. लग्नकार्यात, यात्रा-जत्रामध्ये, मंगलकार्यात नेहमी बँड पथकांना मागणी वाढती असते. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता शासनाने सर्व सांस्कृतिक कार्यक्रम, विवाह समारंभावर कडक निर्बंध घातल्याने सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द झाले आहेत.
डीजेबंदीनंतर बँड पथकांना मागणी थोडीशी वाढली होती. आता या व्यवसायाला चांगले दिवस येतील. यावर्षी काहीतरी पदरात पडेल, अशी आशा असतानाच कोरोनामुळे सर्वच ठप्प झाले आहे. ग्रामीण भागातील बँड पथकांना गावागावात होणाºया यात्रा, तसेच लग्नाच्या आॅर्डर आधीच बुक करून पार्टीकडून अॅडव्हान्सही घेतले गेले आहेत. परंतु कोरोनाचा वाढता प्रसार थोपवण्यासाठी शासनाकडून सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे संबंधिताकडून सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने दिलेला अॅडव्हान्स परत करण्याची वेळ बँड मालकावर आली आहे.
कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून हातात आलेली कामे बंद झाल्यामुळे सर्वच बँड पथकाला आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तर ब-याच कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. बुकिंग केलेले सर्व कार्यक्रम रद्द झाले असल्यामुळे अॅडव्हान्सही परत घेतले जात आहेत. त्यामुळे आर्थिक फटका तर या व्यवसायाला बसला आहे. त्याचबरोबर पथकातील वाजत्री वाजवणाºया सर्वच कलाकारांना देखील बसला आहे.-संतोष वायदंडे, अविनाश बँडवाले, खटाव