वंचित घटकांना दहा जागा सोडल्याशिवाय चर्चा अशक्य : प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 21:40 IST2018-06-28T21:39:36+5:302018-06-28T21:40:10+5:30
आरएसएसच्या मदतीने संविधान बदलण्याचा घाट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घातला असून, सध्या त्यांची केवळ नौटंकी सुरू आहे,’

वंचित घटकांना दहा जागा सोडल्याशिवाय चर्चा अशक्य : प्रकाश आंबेडकर
सातारा : ‘आरएसएसच्या मदतीने संविधान बदलण्याचा घाट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घातला असून, सध्या त्यांची केवळ नौटंकी सुरू आहे,’ असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, ‘लोकसभा निवडणुकीत वंचित घटक आघाडीला दहा जागा सोडल्या तरच भाजप, शिवसेना विरहित पक्षांशी चर्चेचे दरवाजे उघडे असतील,’ असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी केले.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर दौरा काढण्यात आला असून, अॅड. प्रकाश आंबेडकर हे गुरुवारी साताऱ्यात आले होते. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलवत होते.अॅड. आंबेडकर म्हणाले, ‘सातारा जिल्'ाची समिती गठीत केली असून, त्यानंतर तालुक्याच्या समिती गठीत करण्यात येणार आहे,’ असे सांगून आंबेडकर पुढे म्हणाले, ‘मोदी सरकाच्या विरोधात वातावरण चालले आहे. हे वातावरण डायव्हर्ट करण्यासाठी भाजपाकडून मोदींच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले जात आहे. आत्तापर्यंत किती पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी आली, याची माहिती आरएसएस आणि भाजपाने द्यावी. पंतप्रधान मोदी यांचा जीव वाचविण्यासाठी दुसरा पंतप्रधान नेमावा म्हणजे त्यांच्या जीवाचा खतरा टळेल. शासनाच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. काळा पैसा आणतो, अशी केलेली घोषणा ही घोषणाच राहिली.’
अॅड. आंबेडकर पुढे म्हणाले, ‘संविधान मोडण्याचा घटनेत अधिकार नाही, असे असताना डायरेक्ट यूपीएससी अधिकारी नेमून संविधान मोडण्याचा घाट घातला जात आहे. लोकशाहीचे सामाजीकरण आणि सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. काही वर्षांपूर्वी संत कबीर यांच्या जीवनावर एक मालिका प्रसारित होणार होती. मात्र, त्यावेळी भाजपने आंदोलन करून त्याचे प्रसारण थांबविले होते. संत कबीर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरू मानले होते.
मात्र, संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मोदी यांनी गुरू मानले. मोदी यांच्या अशाप्रकारच्या संतांच्या बाबतीतही नौटंकी सुरू आहे.’यावेळी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवरही टीका केली. काँग्रेसचे एकला चलोचे राजकारण घातक असून, काँग्रेस अन् शरद पवार भाजपशी लढूच शकत नाहीत.