Satara- ग्राऊंड रिपोर्ट: मृत्यूच्या काठावरुन धोकादायक प्रवास, उड्डाणपुलांवरच महामार्ग तोडला 

By संजय पाटील | Updated: May 29, 2025 18:01 IST2025-05-29T18:00:59+5:302025-05-29T18:01:47+5:30

वाहने कोसळण्याची भिती; अपघात वाढले

Dangerous journey for motorists continues as highway from Umbraj to Karad on flyover has been cut | Satara- ग्राऊंड रिपोर्ट: मृत्यूच्या काठावरुन धोकादायक प्रवास, उड्डाणपुलांवरच महामार्ग तोडला 

Satara- ग्राऊंड रिपोर्ट: मृत्यूच्या काठावरुन धोकादायक प्रवास, उड्डाणपुलांवरच महामार्ग तोडला 

संजय पाटील

कऱ्हाड : सहापदरीच्या रेट्यात महामार्गासह उपमार्गाच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या आहेत. उंब्रजपासून कऱ्हाडपर्यंतचे उपमार्गही सहापदरीने पूर्णपणे गिळलेत. त्यातच उड्डाणपुलावर महामार्ग तोडण्यात आल्याने वाहनधारकांचा मृत्युच्या काठावरुन धोकादायक प्रवास सुरू आहे. चालकाचा फुटभर अंदाज चुकला तरी वाहन थेट खाली कोसळण्याची शक्यता असून ठिकठिकाणी अशी परिस्थिती आहे.

उंब्रज ते कऱ्हाड हे अंतर सरासरी सतरा किलोमीटरचे. मात्र, या अंतरात पंधरापेक्षा जास्त ठिकाणी धोकादायक परिस्थिती आहे. ठीकठिकाणी महामार्ग तोडला गेला आहे. नवीन महामार्ग, उड्डाणपूल, भुयारी मार्गांचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीचे अक्षरश: तीनतेरा वाजलेत. त्याबरोबरच सुरक्षात्मक उपाययोजना नसल्यामुळे अपघातांचे प्रमाणही कित्येक पटींनी वाढले आहे. काही ठिकाणी केवळ दगड उभे करून सुरक्षिततेचा दिखावा केला गेला आहे. तर काही ठिकाणी दोन-दोन फुटांचे खांब उभे करून हास्यास्पद सुरक्षा व्यवस्था उभारली गेली आहे.

सहापदरीसाठी ठिकठिकाणचे उपमार्ग महामार्गाला जोडले गेले आहेत. त्यामुळे  स्थानिकांची रहदारी महामार्गावरूनच सुरू आहे. काही ठिकाणी नवीन उपमार्गासाठी खोदकाम केले आहे. मात्र तेही अर्धवट सोडण्यात आल्यामुळे खोदलेल्या खड्ड्यात पाण्याचे डोह साचले आहेत. परिणामी त्यामध्ये पडून एखाद्याचा जीव जाण्याची अथवा वाहन कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वळण मार्गांमुळे डोकेदुखी

उंब्रजपासून कऱ्हाडपर्यंत काही ठिकाणी सहापदरीच्या कामामुळे वळण मार्ग तयार करण्यात आले आहेत. त्याबरोबरच स्थानिक वाहतुकीसाठीही उपमार्गावर वळण मार्ग बनविण्यात आले आहेत. मात्र, हे मार्ग अपघाताचे कारण बनत आहेत.

कुठून जायचं तेच कळेना!

वाहनाला गती आली की समोर ‘डायव्हर्शन’चा फलक दिसतो. उपमार्गावर वाहन घातले की अरुंद रस्ता सुरू होतो. आणि उपमार्ग संपताच पुन्हा वळण घेऊन महामार्गावर जावे लागते. त्यामुळे या सर्कशीत नेमकं जायचं कुठून, हेच चालकांना कळेनासे होते.

उघड्या गटरचा धोका जास्त

महामार्ग आणि उपमार्गाच्या मध्यभागी आठ ते दहा फूट खोलीची गटर खोदण्यात आली आहेत. काही ठिकाणी त्याचे बांधकाम केले आहे. तर काही ठिकाणी ती तशीच सोडली आहेत. त्या गटारीमध्ये पाणी साचले असून चालकाचा ताबा सुटला तर वाहने थेट गटारात कोसळण्याची भीती आहे.

तीन पदरी लेन अचानक संपते तेव्हा..

उंब्रजपासून कऱ्हाडपर्यंत महामार्गावर काही ठिकाणी तीन लेन बनविल्या आहेत. लेनचे काम पूर्ण झाल्यामुळे चालक भरधाव वाहने चालवितात. मात्र, काही अंतरावरच एका लेनचे काम अर्धवट सोडलेले असल्याने चालकाला वाहन नियंत्रित करताना कसरत करावी लागते. वाहन नियंत्रित झाले तर ठीक अन्यथा पुढे जाऊन वाहन खड्ड्यात आदळते.

तासवडेत महामार्गाची एक बाजु उद्ध्वस्त

तासवडे येथे जुन्या टोलनाक्याच्या जागेवर महामार्गाची एक बाजू पुर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले असून एकाच लेनवरुन दुहेरी वाहतूक सुरू आहे.

Web Title: Dangerous journey for motorists continues as highway from Umbraj to Karad on flyover has been cut