महाराष्ट्रातील ‘चेरापुंजी’; सातारा जिल्ह्यातील पाथरपुंजला उच्चांकी पाऊस!, किती झाली पावसाची नोंद.. वाचा
By संजय पाटील | Updated: May 28, 2025 16:35 IST2025-05-28T16:35:12+5:302025-05-28T16:35:43+5:30
हे गाव सातारा जिल्ह्यात असले तरी गावातील घरे तिन्ही जिल्ह्यांत विभागली गेली आहेत, हे विशेष.

संग्रहित छाया
संजय पाटील
कऱ्हाड (जि. सातारा) : देशातील मेघालय राज्यात असलेले चेरापुंजी हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. मात्र, गत काही वर्षांत सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या पाथरपुंजमध्ये सर्वाधिक पाऊस कोसळतोय. ३१ मे २०२४ पासून आजअखेर पाथरपुंजमध्ये झालेल्या एकूण पावसाच्या नोंदीने चेरापुंजीतील पावसाच्या आकडेवारीचा विक्रमही मोडीत काढलाय. वर्षभरात चेरापुंजीपेक्षा तब्बल १ हजार ४२१ मिलीमीटर जास्त पाऊस पाथरपुंजमध्ये नोंदला गेला आहे.
जिल्ह्यात नवजा आणि महाबळेश्वर ही सर्वाधिक पावसाची ठिकाणे म्हणून ओळखली जातात. मात्र, गत काही वर्षांत त्यामध्ये बदल होताना दिसत आहे. पाथरपुंजमध्ये पडणाऱ्या विक्रमी पावसाची नोंद सुरुवातीला २०१९ मध्ये केली गेली. त्यावेळी जून ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत पाथरपुंजला ७ हजार ३५९ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली होती, तर याच कालावधीत चेरापुंजीत ५ हजार ९३८ मिलिमीटर एवढा पाऊस झाला होता. त्यामुळे चेरापुंजीऐवजी पाटण तालुक्यातील पाथरपुंज देशातील सर्वांत जास्त पावसाचे ठिकाण म्हणून चर्चेत आले.
३१ मे २०२४ ते २७ मे २०२५ या कालावधीतही पाथरपुंजला उच्चांकी पाऊस नोंदला गेला असून, हा पाऊस राज्यातील सर्वाधिक, तसेच देशातही अग्रेसर असावा. पाथरपुंजमध्ये जून, जुलै आणि ऑगस्ट २०२४ या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस नोंदला गेला आहे. त्यानंतरही अधूनमधून येथे पावसाची नोंद झाली आहे. आजअखेर येथे चेरापुंजीपेक्षा १ हजार ४२१ मिलिमीटर जास्त पाऊस नोंदला गेलाय.
कुठे आहे पाथरपुंज?
पाटण तालुक्यात कोयनानगरच्या नैऋत्येला पाथरपुंज हे गाव आहे. भैरवनाथ गडापासून या गावाकडे जाता येते. हे गाव सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमारेषेवर असून, हे गाव सातारा जिल्ह्यात असले तरी गावातील घरे तिन्ही जिल्ह्यांत विभागली गेली आहेत, हे विशेष.