सातारा जिल्ह्यात बिबट्यासाठी पिंजरे अन् अलार्म सिस्टीम बसविणार - शंभूराज देसाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:58 IST2025-12-26T15:58:04+5:302025-12-26T15:58:39+5:30
नागरिकांनी घाबरून जाऊ नये

सातारा जिल्ह्यात बिबट्यासाठी पिंजरे अन् अलार्म सिस्टीम बसविणार - शंभूराज देसाई
सातारा : सातारा जिल्ह्यातील मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढला आहे. हा वावर कमी करण्यासाठी पिंजरे लावण्यात येतील तसेच अलार्म सिस्टीमही बसविण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
येथील पालकमंत्री कार्यालयात पत्रकार परिषदेत देसाई बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, आदी उपस्थित होते.
पालकमंत्री देसाई म्हणाले, जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून बिबट्याचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे. ऊसक्षेत्रालगतच हा बिबट्या दिसतोय. सातारा जिल्ह्यासाठी वनमंत्र्यांनी बिबट्यांना पकडण्यासाठी २० पिंजरे वाढवून दिलेत. ते लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर ड्रोनही दिलेले आहेत. बिबट्यांचा वावर असणाऱ्या भागातील लोकांनी सावधानता बाळगावी यासाठी ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, पोलिस पाटील, सरपंच यांच्या ग्रामसभा घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांची बिबट्यापासून काळजी घेतली जाईल. त्यामुळे लोकांनीही घाबरून जाऊ नये.
वनक्षेत्रात बेकायदा बांधकामे झाली आहेत. याबाबत राज्यातच धोरणात्मक निर्णय होणे गरजेचे आहे, असे सांगून पालकमंत्री देसाई पुढे म्हणाले, वनविभागानेही बिबट्याबाबत उपाययोजना राबवाव्यात. जंगलात शेळ्या सोडण्याचा विषय हा राज्यासाठी लागू झाला तर साताऱ्यासाठीही तो असेल. पिंजऱ्यात बिबट्या सापडला तर त्याला त्याच्या मूळ अधिवासात सोडण्यात येईल. त्यामुळे तो पुन्हा मानवी वस्तीकडे येणार नाही, हे पाहिले जाईल, असेही पालकमंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.
जि. प. निवडणुकीत महायुती...
सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक महायुती म्हणून लढविणार का ? असा प्रश्नही पत्रकारांनी केला. यावर नगरपालिका निवडणुकीत आमच्याकडून महायुती करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. तरीही आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत महायुती करण्याचा प्रयत्न करू. नाहीतर पुढील निर्णय घेऊ, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.