Satara ZP: ‘एकला चलो रे’चा नारा देत भाजपच्या नेत्यांनी शंभूराजेंवर टीकेची झोड उठवली, निकालानंतर 'त्यांचाच' आधार घेण्याची वेळ आली
By सचिन काकडे | Updated: February 13, 2026 18:29 IST2026-02-13T18:28:42+5:302026-02-13T18:29:31+5:30
साताऱ्यात नवा ‘पॅटर्न’ उदयास येणार की जुने मित्र एकत्र येणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली

Satara ZP: ‘एकला चलो रे’चा नारा देत भाजपच्या नेत्यांनी शंभूराजेंवर टीकेची झोड उठवली, निकालानंतर 'त्यांचाच' आधार घेण्याची वेळ आली
सचिन काकडे
सातारा : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत ‘एकला चलो रे’चा नारा देत भाजपच्या नेत्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीकेची झोड उठवली. मात्र, निकालानंतर बहुमताचा आकडा हुकल्याने आता त्याच पालकमंत्र्यांचा आधार घेण्याची वेळ भाजपवर आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ‘आम्ही हातात हात नव्हे, तर अलिंगन द्यायलाही तयार आहोत,’ असे म्हणत एक पाऊल पुढे टाकल्याने साताऱ्यात नवा ‘पॅटर्न’ उदयास येणार की जुने मित्र एकत्र येणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र येत भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले. भाजपने २७ जागा जिंकून मोठेपण सिद्ध केले असले तरी सत्ता स्थापनेसाठी लागणारी मॅजिक फिगर गाठता आली नाही, तर दुसरीकडे १५ जागा जिंकून ‘किंगमेकर’ ठरलेल्या शिंदेसेनेशिवाय भाजपचा सत्तेचा मार्ग सुकर होणे अशक्य आहे. सध्या तरी शंभूराज देसाई यांच्या मौनामुळे भाजपची धाकधूक वाढली असून, आरोप - प्रत्यारोपांनी दुखावलेली शिंदेसेना मात्र ताकही फुंकून पीत आहे.
गणित बिघडले, भाषा बदलली...
निवडणुकीच्या प्रचारात भाजपने पालकमंत्र्यांवर आणि त्यांच्या कार्यशैलीवर जोरदार प्रहार केले होते. ‘टांगा पलटी, घोडे फरार, मालकमंत्री,’ यांसारख्या विधानांनी युतीमध्ये मिठाचा खडा पडला होता. मात्र, सत्तेचे गणित बिघडताच भाजपची भाषा बदलली. कालपर्यंत जे ‘लक्ष्य’ होते, तेच आता सत्तेसाठी मुख्य ‘आधार’ बनले आहेत.
मजल मारली तरीही दूर राहिली...
नगरपालिकेच्या पावलावर पाऊल ठेवत भाजपने जिल्हा परिषदेतही स्वबळावर मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. ६५पैकी सर्वाधिक जागा लढवूनही भाजपने २७ जागांवर मजल मारली. मात्र, मित्रपक्षांना गृहीत धरण्याची रणनिती आणि नेत्यांवरील वैयक्तिक टीका भाजपला बहुमतापासून चार पावले दूर ठेवून गेली. सत्तेचे स्वप्न साकारण्यासाठी आता भाजप कोणते डावपेच आखणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
वाचा: ठासून कुठलं, सगळं घासूनच आलंय; शिंदेसेनेचा उमेदवार तर केवळ एका मतानं विजयी
पडद्याआड अनेक घडमोडी
भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि त्यांनी २० जागांवर विजय मिळवला. शिंदेसेनेला सोबत घेऊन जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्याच्या हालचालीही पडद्यामागे सुरू आहेत. अशा स्थितीत भाजपला आपली सत्ता राखण्यासाठी शिंदेसेनेची मनधरणी करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात अनेक राजकीय घडामाेडी घडणार हे निश्चित.