पावसाचा धोका; साताऱ्यात ४८९ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर 

By नितीन काळेल | Updated: July 24, 2023 19:27 IST2023-07-24T19:17:55+5:302023-07-24T19:27:01+5:30

जिल्ह्याच्या पश्चिमेकडील दरडप्रवण गावांत सतर्कता

489 families shifted to safe place in Satara | पावसाचा धोका; साताऱ्यात ४८९ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर 

पावसाचा धोका; साताऱ्यात ४८९ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर 

सातारा : सततचा पाऊस आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क असून दरडप्रवण भागातील ४८९ कुटुंबांना आतापर्यंत स्थलांतरित करण्यात आले आहे. चार दिवसांतच १२० कुटुंबांची यामध्ये वाढ झाली आहे. तर साताऱ्यासह वाई, पाटण, जावळी आणि महाबळेश्वर या पश्चिमेकडील तालुक्यातील हे नागरिक आहेत. त्यांना शाळा, निवारा शेड, मंदिरात ठेवण्यात आलेले आहे.

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात आठ दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यातच २७ जुलैपर्यंत जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. त्यातच मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी रस्ते खचत असून पूल वाहून गेले आहेत. दरडीही कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन संवेदनशील ठिकाणच्या नागरिकांचे स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. 

चार दिवसांपासून जिल्हा प्रशासनाने धोकादायक गावातील कुटुंबांना तात्पुरते स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पश्चिम भागातील पाच तालुक्यातील दरडप्रवण गावातील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. गुरुवारी स्थलांतरित कुटुंबीयांचा आकडा ३६९ झाला होता. तर साेमवारपर्यंत त्यामध्ये आणखी वाढ झाली. सध्या स्थलांतरित कुटुंबांचा आकडा ४८९ झाला आहे. पाऊस आणखी वाढल्यास स्थलांतरित कुटुंबीयांची संख्याही वाढणार आहे.

स्थलांतरित कुटुंबीयांची माहिती तालुका आणि गावे...

सातारा तालुका : मोरेवाडीतील, सांडवालीतील आणि भैरवगड.
जावळी : बोंडारवाडी, भुतेघर, नरफदेव, रांजणी आणि धनगरपेढा
वाई : जोर गाव, गोळेगाव-गोळेवस्ती
पाटण : मिरगाव, हुंबरळी, ढोकावळे आणि म्हारवंड
महाबळेश्वर : माचूतर, एरंडल, शिंदोळा, दुधोशी, दरे, चतूरबेट, मालूसर, येर्णे

Web Title: 489 families shifted to safe place in Satara