सांगलीचे ‘द्राक्ष संशोधन केंद्र’ नेमके कुठे अडकले?, विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विश्वजित कदम यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 19:13 IST2026-03-06T19:13:06+5:302026-03-06T19:13:52+5:30
फलोत्पादनमंत्री भरत गोगावले यांची सकारात्मक भूमिका

सांगलीचे ‘द्राक्ष संशोधन केंद्र’ नेमके कुठे अडकले?, विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विश्वजित कदम यांचा सवाल
कडेगाव : महाविकास आघाडी सरकारच्या काळात सांगली येथे ‘द्राक्ष संशोधन केंद्र’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तत्कालीन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे आणि कृषी राज्यमंत्री आ. डॉ. विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूदही करण्यात आली होती. मात्र सरकार बदलल्यानंतर या संशोधन केंद्राच्या उभारणीची प्रक्रिया नेमकी कुठे अडकली, असा सवाल आमदार विश्वजित कदम यांनी विधानसभेत केला.
विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात आमदार विश्वजित कदम यांनी हा मुद्दा उपस्थित करत, “सांगलीच्या द्राक्ष उत्पादकांच्या भविष्याचा हा प्रश्न आहे. केवळ घोषणा करून चालणार नाही; संशोधन केंद्र प्रत्यक्षात उभे राहिले पाहिजे,” अशी ठाम भूमिका मांडली.
सांगली जिल्हा राज्यातच नव्हे तर देशातही द्राक्ष उत्पादनासाठी अग्रस्थानी मानला जातो. जिल्ह्यातील तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, पलूस आणि जत या तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर द्राक्षलागवड होते. त्यातही तासगाव तालुका बेदाणा उत्पादनासाठी राज्यभर प्रसिद्ध आहे. या संपूर्ण पट्ट्यातून निर्यातक्षम दर्जेदार द्राक्षांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून हजारो शेतकऱ्यांचे अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे.
मात्र गेल्या काही वर्षांत अनियमित पाऊस, बदलते हवामान, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव आणि बाजारातील चढ-उतार यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. हवामानातील बदलांमुळे कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा खर्च झपाट्याने वाढला असून उत्पादनखर्च आणि उत्पन्न यातील तफावत वाढत चालली आहे.
यावर उत्तर देताना राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी सकारात्मक भूमिका घेतली. सांगलीतील द्राक्ष संशोधन केंद्राचे काम थांबले असेल, तर त्यामागील कारणांची सविस्तर माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी सभागृहात दिली.
द्राक्ष संशोधन केंद्र का महत्त्वाचे?
- सांगली जिल्हा राज्यातील प्रमुख द्राक्ष निर्यात पट्टा
- तासगावची बेदाणा उत्पादनासाठी राज्यभर ओळख
- हवामान बदल, कीड-रोग आणि वाढता उत्पादनखर्च
- स्थानिक पातळीवर तांत्रिक मार्गदर्शनाची गरज
- दर्जावाढ व निर्यात निकष पूर्ण करण्यासाठी सक्षम संशोधन केंद्र आवश्यक