आईच्या संघर्षाला मुलांच्या देदीप्यमान यशाचे कोंदण! तीन मुले डॉक्टर, एक तहसीलदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:13 IST2019-03-10T00:12:34+5:302019-03-10T00:13:25+5:30
संकटे कधी सांगून येत नाहीत; मात्र याच संकटांना शरण जाऊन काम केले तर, इतिहासही घडत नाही. अशीच काहीशी संकटांची मालिका आली असतानाही त्यावर मात करत चारही मुलांना उच्चशिक्षित-उच्चपदस्थ

आईच्या संघर्षाला मुलांच्या देदीप्यमान यशाचे कोंदण! तीन मुले डॉक्टर, एक तहसीलदार
शरद जाधव ।
सांगली : संकटे कधी सांगून येत नाहीत; मात्र याच संकटांना शरण जाऊन काम केले तर, इतिहासही घडत नाही. अशीच काहीशी संकटांची मालिका आली असतानाही त्यावर मात करत चारही मुलांना उच्चशिक्षित-उच्चपदस्थ बनविण्याचे ध्येय सांगलीतील एका माऊलीने पूर्ण केले आणि त्या म्हणजे इंदुमती भीमसेन जाधव. तीन मुले एमबीबीएस, एम. डी. डॉक्टर, तर एक मुलगी तहसीलदार असे मुलांच्या उच्च पदासाठी व त्याबरोबरच उच्च संस्कारांसाठी त्यांची मेहनत आजही सुरूच असते.
प्रत्येक अडचणींवर मात करून आपल्या कुटुंबाला आकार देणारी असते ती माताच. असाच संघर्षमय प्रवास इंदुमती जाधव यांचा आहे. दरीबडची सासर, तर रांजणी माहेर अशा ग्रामीण भागातून सांगलीत येत त्यांनी कर्तृत्व सिध्द केले आहे. कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी शिक्षिका म्हणूनही उल्लेखनीय काम केले आहे. त्यामुळेच इंग्रजीतील व मराठीतील प्रेरणादायी वाक्ये त्यांच्या बोलण्यात सहजपणे येतात.
पती शिक्षक व स्वत:ही नगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका. वरवर पाहता एक मध्यमवर्गीय सुखी कुटुंब. मात्र, विविध कारणाने वाढलेला कर्जाचा बोजा आणि त्याच्या मानसिक तणावामुळे कुटुंबावर संकटांची मालिकाच सुरू झाली. त्यानंतर पतीच्या निधनाचा धक्का सहन करत त्यांनी चारही मुलांना चांगले शिकविले. त्या सांगतात, अनेक पालक पाल्यांना शिक्षणासाठी चांगल्या शाळेत प्रवेश घेतात. मी स्वत: नगरपालिका शाळेत काम करत असल्याने मुलांनाही नगरपालिकेच्याच शाळेत शिकविले.
केवळ शाळेतच नव्हे, तर पुढे एमबीबीएससारखा अभ्यासक्रमही सर्वांनी गुणवत्तेवर पूर्ण केला. त्यामुळेच त्यांचे पुत्र डॉ. मदन जाधव एमबीबीएसनंतर एम.एस. न्यूरोसर्जन, डॉ. महेश एमबीबीएसनंतर एम.एस. प्लास्टिक अॅण्ड कॉस्मेटिक सर्जन, कन्या डॉ. नीशाराणी एम. डी. झाल्या, तर कविता जाधव स्पर्धा परीक्षेतून तहसीलदारपदी निवडल्या गेल्या. मुलांनी आईने घेतलेल्या कष्टातून उतराई होण्याचा प्रयत्न केला.
आता कुटुंब स्थिरस्थावर झाले असले तरी, सामाजिक बांधिलकीची जपणूक सुरू असते.
संकटे शब्दबध्द करून कविता; पुस्तके विकून कुटुंबाला आधार
जगण्याचा संघर्ष लढताना आलेल्या संकटाला इंदुमती जाधव यांनी शब्दबध्द करण्यास सुरुवात केली आणि कवितांचे पुस्तकही प्रकाशित केले. एकाचवेळी सर्वांचे शिक्षण सुरू असल्याने पैशाची चणचण भासत होतीच. हार मानतील त्या इंदुमती कसल्या! त्यांनी स्वत: लिहिलेल्या कवितांची पुस्तके विविध ठिकाणी जाऊन विकून पैसा जमविला. ज्या-ज्याठिकाणी शिक्षकांचे उद्बोधन वर्ग असतील त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पुस्तके विकली.