लोकसभा पूर्वरंग: १९९९ ला प्रकाशबापू व मदन पाटील यांच्यात झाली लढत

By हणमंत पाटील | Published: April 11, 2024 11:23 AM2024-04-11T11:23:15+5:302024-04-11T11:23:38+5:30

अटलबिहारी वाजपेयी १९९६ मध्ये सर्वप्रथम पंतप्रधान झाले होते. पण तेंव्हा त्यांचं सरकार केवळ १३ दिवसांतच कोसळले. १९९८च्या निवडणुकीनंतर वाजपेयी ...

there was a fight between Prakashbapu and Madan Patil for Sangli Lok Sabha 1999 | लोकसभा पूर्वरंग: १९९९ ला प्रकाशबापू व मदन पाटील यांच्यात झाली लढत

लोकसभा पूर्वरंग: १९९९ ला प्रकाशबापू व मदन पाटील यांच्यात झाली लढत

अटलबिहारी वाजपेयी १९९६ मध्ये सर्वप्रथम पंतप्रधान झाले होते. पण तेंव्हा त्यांचं सरकार केवळ १३ दिवसांतच कोसळले. १९९८च्या निवडणुकीनंतर वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले. एप्रिल १९९९मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (रालोआ) घटक पक्ष असलेल्या ऑल इंडिया अण्णा द्रमुक पक्षाच्या (एआयडीएमके) जयललिता यांनी या सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने केवळ एका मताने विश्वासदर्शक ठराव त्यांच्या विरोधात गेल्याने हे सरकारसुद्धा केवळ १३ महिन्यांमध्ये कोसळलं. त्यामुळे पुन्हा सप्टेंबर - ऑक्टोबर १९९९ मध्ये निवडणूक घेण्याची घोषणा केली गेली. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाजपेयी यांनी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळली.

या काळजीवाहू सरकारच्या काळात भाजपचे समर्थन वाढावं, अशा काही गोष्टी झाल्या. वाजपेयीचं सरकार केवळ एका मताने विश्वासदर्शक ठराव हरल्याने भाजपाबाबत एक सहानुभूतीचं वातावरण तयार झालेले होते. दुसरं म्हणजे सप्टेंबर १९९९ मध्ये निवडणूक होण्याआधी ८ मे ते २६ जुलै, १९९९ दरम्यान कारगिल युद्ध झालं. या युद्धातील लष्कराच्या विजयामुळे भाजपचं व वाजपेयींच्या नेतृत्त्वाचं कौतुक होऊन भाजपबद्दल भावनिक लाट तयार झाली होती. यापूर्वी, भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे भाजपपासून दूर राहणारे काही प्रादेशिक पक्ष वाजपेयी यांच्या उदारमतवादी व राष्ट्रीय स्तरावरील नेते अशा प्रतिमेमुळे भाजपशी आघाडी करण्यास तयार झाले होते.

या सर्व पार्श्वभूमीवर १९९९च्या निवडणुकीपूर्वीच भाजपला राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये किमान समान कार्यक्रमाच्या आधारे विविध लहान - मोठ्या पक्षांना सामील करून घेण्यात यश आले. जागांचं वाटपही एकमेकांच्या सहकार्याने करण्यात आले. त्याचवेळी काँग्रेस पक्षाला मात्र लालूप्रसाद यादव यांचा बिहारमधील 'राष्ट्रीय जनता दल' व केरळमधील ३ लहान पक्ष सोडता आघाडी बांधणे शक्य झालेले नव्हते. या सर्व परिस्थितीचा लाभ मिळून रालोआचे १९९९च्या निवडणुकीचे निकाल सकारात्मक ठरले.

१९९९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे प्रकाशबापू पाटील यांना ३,८१,१६२ मते मिळून विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे मदन विश्वनाथ पाटील यांना २,२०,६०२ मते मिळाली.

१९९९च्या निवडणुकीत रालोआला ५४३ पैकी २७० जागांवर यश प्राप्त झाले. त्यात आंध्र प्रदेशमधील तेलगू देसम पक्षानेही बाहेरून समर्थन देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे तेराव्या लोकसभेत भाजप नेतृत्त्वाखालील रालोआला निर्णायक बहुमत मिळाले. १३ ऑक्टोबर १९९९ रोजी अटलबिहारी वाजपेयी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सुत्रे स्वीकारली.

काँग्रेसमधून राष्ट्रवादी फुटली

महाराष्ट्रातील शिवसेना - भाजप युतीच्या सरकारने सहा महिने मुदतीअगोदर लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १९९९मध्ये विधानसभा व लोकसभा या निवडणुका एकत्र घेण्यात आल्या. या काळात शरद पवार यांनी सोनिया गांधींच्या विदेशी मुद्यावर काँग्रेस पक्ष सोडला व  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. यावेळी सांगली जिल्ह्यातून शिराळा - शिवाजीराव नाईक, वाळवा - जयंतराव पाटील, भिलवडी वांगी - डॉ. पतंगराव कदम, सांगली - दिनकर पाटील, मिरज - हाफिज धत्तुरे, तासगाव - आर. आर. पाटील, खानापूर आटपाडी - अनिलराव बाबर, कवठेमहांकाळ - अजितराव घोरपडे, जत - उमाजी सनमडीकर हे विधानसभेवर निवडून आले.

राज्यात काँग्रेस - राष्ट्रवादीचे सरकार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ७५, राष्ट्रवादी काँग्रेस ५८, भाजप ५६, शिवसेना ६९ अशा जागा मिळाल्या. कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले. काँग्रेसच्या ७५ व राष्ट्रवादी ५८ व काही अपक्ष मिळून काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत आले. विलासराव देशमुख हे १८ ऑक्टोबर १९९९ रोजी मुख्यमंत्री झाले.

- ॲड. बाबासाहेब मुळीक, ज्येष्ठ विधिज्ञ, विटा

Web Title: there was a fight between Prakashbapu and Madan Patil for Sangli Lok Sabha 1999

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.