Sangli ZP Election Voting 2026: सकाळी संथ, दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला; सांगलीत 'या' तीन तालुक्यांत सर्वाधिक मतदान
By अशोक डोंबाळे | Updated: February 7, 2026 19:34 IST2026-02-07T19:34:37+5:302026-02-07T19:34:55+5:30
सायंकाळी ७ वाजेपर्यंत अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या

Sangli ZP Election Voting 2026: सकाळी संथ, दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला; सांगलीत 'या' तीन तालुक्यांत सर्वाधिक मतदान
सांगली : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदारांनी उत्साह दाखविला. सकाळी ७:३० वाजता सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेत प्रारंभी मतदारांचा प्रतिसाद मंद होता; पण दिवस वाढत गेला तसा मतदानाचा टक्काही वेगाने उंचावत गेला. सायंकाळी ७ वाजेपर्यंत अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. प्रशासनाचा अंदाज आहे की, अंतिम टक्केवारी जवळपास ७० टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. दरम्यान, वाळवा, पलूस, कडेगाव तालुक्यांत सर्वाधिक तर कवठेमहांकाळ, जत, खानापूर तालुक्यांत मतदान कमी झाले.
जिल्हा परिषद आणि १० पंचायत समित्यांसाठी जिल्ह्यात १८ लाख १८ हजार ७४२ मतदार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता आलेल्या पहिल्या अहवालानुसार, जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये फक्त ७.०३ टक्के मतदान झाले होते. पहिल्या दोन तासांत मतदान केंद्रांवर रांगा कमी दिसत होत्या. मात्र, पुढील दोन तासांत मतदारांनी जोरदार प्रतिसाद दिला. दुपारी ११:३० वाजता मतदानाचा टक्का २०.३० पर्यंत पोहोचला, म्हणजेच अवघ्या दोन तासांत १३.२७ टक्क्यांची झेप! दुपारी १:३० वाजता हा आकडा ३६.०१ टक्के झाला.
दुपारनंतर मतदानाचा वेग आणखी वाढला. दुपारी ३:३० वाजता जिल्ह्यातील सरासरी मतदान ५१.४७ टक्के झाले होते. म्हणजे, दुपारच्या दोन तासांत १५.४० टक्क्यांची भर पडली. विशेषतः वाळवा, पलूस, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांत मतदारांचा उत्साह लक्षणीय होता.
तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी पाहता, वाळवा तालुक्यात दुपारी ३:३० वाजता ५८.५९ टक्के, पलूसमध्ये ५६.०४ टक्के, तर कडेगावमध्ये ५५.९४ टक्के मतदान झाले होते.
आटपाडी (५४.३५), शिराळा (५४.१८) या तालुक्यांतही टक्केवारी ५४च्या पुढे गेली. दुसरीकडे, जत (४७.०९), मिरज (४६.९९) आणि कवठेमहांकाळ (४५.१९) या तालुक्यांत तुलनेने कमी टक्केवारी नोंदवली गेली. तरीही दिवसाच्या शेवटच्या टप्प्यात येथेही मतदान वेग घेत असल्याचे दिसले.
मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली. जिल्हाधिकारी आणि निवडणूक यंत्रणेच्या प्रयत्नांमुळे मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधा पुरवल्या गेल्या होत्या. महिलांचा सहभाग, तरुण मतदारांचा उत्साह आणि ग्रामीण भागातील जनजागृतीमुळे मतदानाची टक्केवारी ७० पर्यंत जाईल, असा प्रशासनाचा अंदाज होता.
जिल्हा परिषदेसाठी दिवसभरातील मतदानाची टक्केवारी
तालुका - सकाळी ९.३० / स. ११:३०/ दु. १:३० / दु. ३:३०
- आटपाडी / ५.८२ / १९.३८ / ३६.९२ / ५४.३५
- जत / ५.८५ / १७.३६ / ३१.९३ / ४७.०९
- खानापूर / ५.६८ / १८.६६/ ३४.२९ / ४९.६६
- कडेगाव / ७.१२/२१.८०/३९.१३/५५.९४
- तासगाव / ६.८९/१९.७०/३४.६२ / ४८.८४
- क. महांकाळ / ५.८४ / १६.५५ / ३०.२२ / ४५.१९
- पलूस / ९.५७ / २३.८५/ ३९.९६ / ५६.०४
- वाळवा / ९.४० / २४.८२ / ४२.१३ / ५८.५९
- शिराळा / ६.९० / २१.८० / ३८.८९ / ५४.१८
- मिरज / ६.२९ / १८.५१ / ३२.७६ / ४६.९९
- एकूण ७.०३ / २०.३० / ३६.०१ / ५१.४७