सांगली : ढोबळी मिरचीचे दर घसरले; शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 18:46 IST2018-04-24T18:46:40+5:302018-04-24T18:46:40+5:30
मिरज पश्चिम भागात यावर्षी सुमारे दोनशे एकर क्षेत्रावर ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले जात आहे. प्रचंड उन्हाळ्यात मोठ्या कष्टाने पिकाची काळजी घेतली जात आहे. परिसरातून सुमारे ६० टन माल मुंबई, पुणे बाजारपेठेत दररोज जात आहे. पण गतवर्षी प्रतिकिलो ३० ते ६० रुपये मिळणारा दर सध्या सहा ते आठ रुपयावर आला आहे. उत्पादन खर्चच प्रतिकिलो चार ते सहा रुपये येत आहे. उत्पन्न अत्यल्प झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

सांगली : ढोबळी मिरचीचे दर घसरले; शेतकरी हवालदिल
कसबे डिग्रज : मिरज पश्चिम भागात यावर्षी सुमारे दोनशे एकर क्षेत्रावर ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले जात आहे. प्रचंड उन्हाळ्यात मोठ्या कष्टाने पिकाची काळजी घेतली जात आहे. परिसरातून सुमारे ६० टन माल मुंबई, पुणे बाजारपेठेत दररोज जात आहे. पण गतवर्षी प्रतिकिलो ३० ते ६० रुपये मिळणारा दर सध्या सहा ते आठ रुपयावर आला आहे. उत्पादन खर्चच प्रतिकिलो चार ते सहा रुपये येत आहे. उत्पन्न अत्यल्प झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
भर उन्हाळा असताना मल्चिंग पेपर, ठिबक, औषधे, खते, मजुरीवर प्रतिएकरी एक लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना खर्च येत आहे. उन्हाळ्यामुळे उत्पादनही घसरले आहे. यात भर म्हणून पुन्हा राज्यातील सर्व बाजारात ढोबळी मिरचीचे दर घसरले आहेत. मुंबई, पुणे येथील बाजारपेठेत प्रतिकिलो ३० ते ६० रुपयांपर्यंत दर मिळत होता. सध्या केवळ प्रतिकिलोला सहा ते आठ रुपये दर मिळत आहे.
उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या पदरात पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी बांधावरच ढोबळी मिरची टाकण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक खर्चही मोठ्याप्रमाणात असल्यामुळे ढोबळी मिरची मुंबई, पुणे येथील बाजारपेठेपर्यंत अल्पदरात पाठवणे परवडत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.
जिल्ह्यातील मिरज पश्चिम भागामध्ये तुंग, कसबे डिग्रज, आष्टा, कवठेपिरान, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, पलूस, आटपाडी, तासगाव, कडेगाव तालुक्यातही शेतकरी ढोबळी मिरचीचे उत्पादन घेत आहे. यामुळे या सर्वच शेतकऱ्यांना दर घसरल्याचा फटका बसला आहे.
व्यापाºयांच्या मनमानी कारभाराकडे कृषीमंत्र्यांनीच लक्ष द्यावे
मुंबई, पुण्यासह राज्यातील बाजार पेठेतील दलाली शासनाने बंद केली आहे. यामुळे व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत. येथील बाजारपेठेत दलालाने सौदे बंद केल्यामुळे ढोबळी मिरचीचे दर घसरल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. दलाल आणि व्यापारी एकत्रित येऊनच शेतीमालाचे दर पाडत असल्यामुळे यांचा बंदोबस्त कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी करावा, अशी मागणीही शेतकरी करू लागले आहेत.