तासगाव : ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा अनेक ठिकाणी उपलब्ध नाही. काही ठिकाणी नेटवर्क नसल्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत स्वाध्याय उपक्रम पोहोचू शकत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेला स्वाध्याय उपक्रम शासनाने स्थगित करावा, अशी मागणी शिक्षक भारतीचे सरचिटणीस कृष्णा पोळ यांनी केली आहे.
ते म्हणाले की, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नत करण्याचा निर्णय झाल्यापासून ऑनलाइन शिक्षणास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गतवर्षीपासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग शिक्षकांनी स्वीकारला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात रहावेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात खंड पडू नये म्हणून शिक्षकांनी व्हाॅट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून, ऑनलाइन तास, स्वाध्याय पुस्तिका यासह दूरचित्रवाणीवरील टिलीमिली, यू ट्यूबवरील शैक्षणिक व्हिडिओंच्या माध्यमातून विविध उपक्रमांतून शिक्षणाचे धडे गिरवले आहेत. पालकांकडे व्हाॅट्सॲप असणारे फोन नसल्यामुळे स्वाध्याय उपक्रमाची सक्ती करू नये. शासनाने सदरचा स्वाध्याय उपक्रम स्थगित करण्यात यावा, अशी मागणी शिक्षक भारतीची आहे.