सांगली जिल्ह्यात पूरपट्ट्यातील तीन हजार घर मालकांना नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 17:12 IST2025-06-30T17:11:23+5:302025-06-30T17:12:41+5:30
तातडीने उपाययोजना करण्याच्या प्रशासनाकडून सूचना

संग्रहित छाया
सांगली : जिल्ह्यातील चार तालुक्यांतील १०४ गावांमध्ये सुमारे तीन हजार घरे धोकादायक आहेत. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर अधिक धोकादायक असलेल्या घरांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, तातडीने उपाययोजना करण्याची सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. या उपाययोजना केल्या नाही तर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज या तालुक्यातील १०४ गावांना पुराचा धोका आहे. या गावांमध्ये संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज करण्यात येते. त्यासाठी बाधित होणाऱ्या गावांमध्ये एप्रिल आणि मे महिन्यात सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची पाहणी केली जाते. अधिक धोकादायक असणाऱ्या घर मालकांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून नोटीस बजावून उपाययोजना करण्याची सूचना केली आहे.
महापुराच्या काळात या गावांना पाण्याचा वेढा पडतो. गावात पाणी शिरते, अशावेळी धोकादायक घरे पडण्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे जीवितहानीही होण्याची शक्यता असते. अशा घरांचे सर्वेक्षण करून या घराची दुरुस्ती करून उपाययोजना करण्याच्या प्रशासनाकडून सूचना केल्या आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यास होणाऱ्या नुकसानीस प्रशासन जबाबदार राहणार नाही, असा इशाराही नोटिसांद्वारे दिला आहे.
पूरपट्ट्यातील गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज केली जाते; मात्र धोकादायक आणि पडण्याच्या स्थितीत असलेल्या घरांची ऐनवेळी दुरुस्ती करणे शक्य नाही. तेव्हा, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अशा धोकादायक घरांच्या मालकांनी घरे दुरुस्त करून घ्यावीत, सुरक्षित करून घ्यावीत तसेच ऐन पावसाळ्यात पूर आल्यास सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठीही तजवीज करावी, या उद्देशाने प्रशासनाकडून या धोकादायक घरांचे सर्वेक्षण करून नोटीस बजावण्याचा प्रयत्न आहे.
धोकादायक घरांची संख्या जैसे थे
गतवर्षीच्या तुलनेत यंदा धोकादायक घरांची संख्या फारशी घटलेली नाही; मात्र गतवर्षी १०९ गावांतील तीन हजार ८८ धोकादायक घरे आढळून आली होती. यंदा १०४ गावांत दोन हजार ९३३ धोकादायक घरे सर्वेक्षणात सापडली आहेत. यातील सर्व घर मालकांना ग्रामपंचायतींनी नोटिसा बजावल्या आहेत; मात्र हे केवळ सर्वेक्षणात दिसून आले आहे. एवढ्यावरच प्रशासन समाधान मानणार का, हा प्रश्न आहे. नेमक्या काय उपाययोजना केल्या आहेत, याबद्दल स्पष्टता नाही.
तालुकानिहाय धोकादायक घरे
तालुका / गावे / धोकादायक घरे
वाळवा ३७ / १०३२
शिराळा २० / १५३
पलूस २७ / १३५७
मिरज २० / ३९१