गाव गाठण्यासाठी सुरु केला पायी प्रवास, पैसेच नाहीत, मग गावाकडे कसे जायचं? तामिळनाडूच्या तरुणासमोर प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 11:35 IST2020-05-06T11:32:12+5:302020-05-06T11:35:24+5:30
अंकली फाटा येथे पोलिसांनी त्यांना अडवून माघारी पाठविले. पण ते कुपवाडला न परतता फळ मार्केटच्या आसपास एका ठिकाणी बसून होते. याची माहिती मिळताच नगरसेविका सवीता मदने यांनी या तरुणांची भेट घेतली.

गाव गाठण्यासाठी सुरु केला पायी प्रवास, पैसेच नाहीत, मग गावाकडे कसे जायचं? तामिळनाडूच्या तरुणासमोर प्रश्न
सांगली : तामिळनाडूतील काही तरुण लॉकडाऊनपासून सांगलीत अडकून पडले आहे. त्यापैकी २० तरुणांनी तिकीटाचे पैसे नसल्याने घराच्या ओढीने पायीच परतण्याचा निर्णय घेतला. पण या तरुणांना मंगळवारी सकाळी अंकली नाक्यावर पोलिसांनी अडवून परत पाठविले. नगरसेविका सविता मदने यांनी समजूत काढून त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. महापालिकेने त्यांना मुळ निवासाच्या ठिकाणी पोहोच केले. पण तिकीटाच्या पैशाचा प्रश्न मात्र सुटलेला नाही. परप्रांतिय मजूर, कामगार, विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्यात जाण्याची व्यवस्था केली जात आहे.
त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अर्जही भरून घेतले जात आहेत. अशातच आता काहींना त्यांच्या राज्यात परतण्यासाठी पैसाची चणचण भासू लागल्याचे समोर येत आहे. असाच प्रकार मंगळवारी सांगलीत घडला. तामिळनाडू येथील ६०० हून अधिक तरुण एका मार्केटिंग कंपनीत प्रशिक्षणासाठी आले होते. लॉकडाऊनमुळे कंपनी बंद झाली. महिन्याभरापूर्वी हे सर्व तरुण पायीच त्यांच्या राज्यात जाण्यासाठी निघाले होते. तेव्हा पोलिस उपअधिक्षक संदीपसिंह गील यांना त्यांची समजूत काढून माघारी आणले. त्यानंतर महापालिकेने या तरुणांच्या जेवण्याची व्यवस्था केली. काही तरुण महापालिकेच्या निवारा केंद्रात आश्रयाला आले तर काहीजण पूर्वी रहात असलेल्या खोल्यामध्ये परतले.
आता परप्रांतिय तरुण, मजूरांना त्यांच्या मुळ गावी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या तरुणांपैकी काहींनी जिल्हा प्रशासनाकडे अर्जही करण्यास सुरूवात केली आहे. त्यातील २० तरुणांना पैसे नसल्याने वेगळी चिंता सतावत होती. भविष्यात तामिळनाडूला जाण्यासाठी रेल्वे अथवा बसची व्यवस्था झाली तर त्याच्या तिकीटाचे पैसे कोठून आणयाचे असा प्रश्न या तरुणांसमोर होता. त्यामुळे त्यांनी पायीच परतण्याचा निर्णय घेत पहाटेच्या सुमारास बाहेर पडले. कुपवाडपासून ते अंकलीमार्गे निघाले होते. अंकली फाटा येथे पोलिसांनी त्यांना अडवून माघारी पाठविले. पण ते कुपवाडला न परतता फळ मार्केटच्या आसपास एका ठिकाणी बसून होते. याची माहिती मिळताच नगरसेविका सवीता मदने यांनी या तरुणांची भेट घेतली. त्यांच्याशी इंग्रजीतून संवाद साधत समजूत काढली. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याशीही त्यांनी संपर्क केला.
आयुक्तांनी तातडीने सहाय्यक आयुक्त सावंता खरात यांना घटनास्थळी पाठविले. नगरसेविका मदने, सहाय्यक आयुक्त खरात यांनी त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. तसेच महापालिकेने त्यांना त्यांच्या निवासस्थळी परत पोहोच केले. पण त्यांच्या पैशांचा प्रश्न मात्र सुटलेला नसल्याने तरुणांच्या चिंता कमी झालेली नव्हती.