सांगली महापालिकेतील ‘घरपट्टी’च्या निवृत्त लिपिकाकडे ३५ लाखांची बेहिशेबी मालमत्ता, चौकशीत निष्पन्न
By घनशाम नवाथे | Updated: June 18, 2025 17:20 IST2025-06-18T17:15:57+5:302025-06-18T17:20:42+5:30
लाचखोरीच्या चौकशीत निष्पन्न

सांगली महापालिकेतील ‘घरपट्टी’च्या निवृत्त लिपिकाकडे ३५ लाखांची बेहिशेबी मालमत्ता, चौकशीत निष्पन्न
घनशाम नवाथे
सांगली : महापालिकेतील घरपट्टी विभागातील निवृत्त लाचखोर कर्मचारी नितीन भिमराव उत्तुरे (वय ६३, रा. सांगलीकर मळा, मिरज) याने सेवा काळात १९ वर्षात ३५ लाख १६ हजार १९२ रूपयांची बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाले. उत्तुरे याच्यासह त्याला प्रोत्साहन देणारी पत्नी वंदना उत्तुरे या दोघांविरूद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महापालिकेतील घरपट्टी विभागात लिपिक पदावर कार्यरत असताना नितीन उत्तुरे याने २०१९ मध्ये घरपट्टी कमी करण्यासाठी ३ हजार रूपयांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तेव्हा सापळा रचून त्याला अटक केली होती. मिरज शहर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता. लाचखोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उत्तुरे याच्या मालमत्तेची चौकशी सुरू होती.
नितीन उत्तुरेसह पत्नीवर गुन्हा दाखल
उत्तुरे याने या काळात तब्बल ३५ लाख १६ हजार १९२ रूपयांची मालमत्ता भ्रष्ट कारभारातून मिळवली. त्यासाठी पत्नी वंदना उत्तुरे हिने प्रोत्साहन दिले असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक विनायक भिलारे यांनी ही चौकशी केली. उपअधीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किशोरकुमार खाडे यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात बेहिशोबी मालमत्तेबाबत फिर्याद दिली. त्यानुसार नितीन उत्तुरे व पत्नी वंदना उत्तुरे या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अंमलदार सुदर्शन पाटील, प्रीतम चौगुले, अजित पाटील, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, सलीम मकानदार, रामहरी वाघमोडे, धनंजय खाडे, सीमा माने, चंद्रकांत जाधव, अतुल मोरे, वीणा जाधव, विठ्ठल रजपूत यांचा चौकशी पथकात समावेश होता.
बेहिशोबी मालमत्तेची तक्रार करा
जिल्ह्यातील लोकसेवक, शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याबाबत खात्रीशीर माहिती असल्यास त्याबाबत तक्रार द्यावी. तसेच लाचेच्या मागणीबद्दलही टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा ०२३३-२३७३०९५ या क्रमांकावर तक्रार करावी असे आवाहन उपअधीक्षक अनिल कटके यांनी केले.