महात्मा फुले यांनी उच्चवर्णीयांच्या वर्तुळातून संमेलने मुक्त केली - तारा भवाळकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:05 IST2025-06-10T16:03:55+5:302025-06-10T16:05:03+5:30
'माणूस सुसंस्कृत, संयमी, विचारशील व्हावा यासाठी संमेलने आवश्यक'

महात्मा फुले यांनी उच्चवर्णीयांच्या वर्तुळातून संमेलने मुक्त केली - तारा भवाळकर
सांगली : जीवनाच्या विकासासाठी संमेलने आवश्यक आहेत. महात्मा फुले यांनी साहित्य संमेलनाला उच्चवर्णीयांच्या वर्तुळातून बाहेर काढले, असे प्रतिपादन दिल्लीतील ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी केले.
सांगलीत सोमवारी महापालिकेच्या वसंत व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. ''साहित्य संमेलनाचे प्रयोजन` या विषयावर त्यांनी भूमिका मांडली. आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, स्त्री सखी महिला मंडळाच्या अध्यक्षा विद्या जोशी यावेळी उपस्थित होते. डॉ. भवाळकर म्हणाल्या, वेगवेगळ्या विचारधारातून वेगवेगळे पंथ आले. या विचारवंतांच्या विचारधारेतून साहित्य संमेलन निर्माण झाले.
समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून इतिहासाकडे पहायला हवे. त्यातूनच जीवनाचा विकास होत गेला. शहाणपण येत गेले. ज्ञानाच्या परंपरेत जीवन जगण्याचे शास्त्र असते. भवाळकर म्हणाल्या, सांगली जिल्ह्यात वर्षाला १०-१२ संमेलने होतात. समाजाच्या सांस्कृतिक आणि मानसिक विकासासाठी संमेलने आवश्यक आहेत. माणूस सुसंस्कृत, संयमी, विचारशील व्हावा यासाठी संमेलने आवश्यक आहेत. सूत्रसंचालन चिंतामणी सहस्त्रबुद्धे यांनी केले. सहायक आयुक्त शिल्पा दरेकर यांनी आभार मानले. संयोजन वि. स. खांडेकर वाचनालयाने केले.
सध्या अनेक प्रकारची संमेलने
डॉ. भवाळकर म्हणाल्या, पुण्यात पहिले साहित्य संमेलन झाले, तेव्हा बहुजन नुकतेच शिकायला लागले होते. ''हे फक्त खालमोडे दादांचे (फक्त पुस्तके वाचणारे) संमेलन'' असे महात्मा फुले म्हणायचे. संमेलनाला उच्चवर्णीयांच्या वर्चस्वातून फुले यांनीच बाहेर काढले. विशिष्ट वर्गातून पुढे त्याचा विस्तार होत गेला. आता तर निरनिराळ्या व्यावसायिकांचीही संमेलने होत आहेत. यंदा शेतकऱ्यांचेही संमेलन झाले. सध्या अनेक प्रकारची संमेलने होत आहेत