सांगली : जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करणे चुकीचे आहे. भाजपबरोबर जाणे म्हणजे अनैसर्गिक युती ठरणार असल्यामुळे त्यांनी तो निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केले.विशाल पाटील म्हणाले, दिवंगत नेते मदन पाटील यांनीही १९९९ मध्ये राष्ट्रवादी आणि दिवंगत नेते संभाजी पवार यांच्याशी युती केली होती; पण, सांगलीकरांनी या युतीला झिडकारले होते. या निवडणुकीत मदनभाऊ यांचा पराभव झाला होता. म्हणून जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करू नये. सांगलीकरांना हा निर्णय रुचणार नाही. म्हणून जयश्रीताई यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय रद्द करण्याची गरज आहे. अजूनही त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही.जयश्रीताई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी मी आणि काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम चर्चा करणार आहे. काँग्रेस पक्षाने कारवाई केली असली तरी त्यावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून तोडगा काढता येतो.
भाजपकडून प्रस्ताव म्हणजे कामाची दखलखासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रस्ताव पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्यांचा हा प्रस्ताव म्हणजे माझ्या कामाची दखल घेतली आहे. याबद्दल चंद्रकांत पाटील यांचे मी आभार मानतो, असे मत खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केले.
जयश्रीताईंचा निर्णय काँग्रेससाठी धक्कादायक : विश्वजित कदमजिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा घेतलेला निर्णय आमच्यासाठी धक्कादायक आहे. मी जयश्रीताई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. २०२४च्या विधानसभा निवडणुकीपासून त्या काँग्रेसपासून दूर होत्या. अपक्ष लढल्यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली होती. या सर्व घडामोडीमुळे त्या नाराज होत्या. जयश्रीताई यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे, असे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले.