आटपाडी : नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालात सर्व विषयात ३५ टक्के गुण मिळवित आटपाडी तालुक्यातील कौठुळी गावचा हेमंत सटाले चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावरही त्याच्या या काठावरच्या समान गुणांची चर्चा रंगली आहे.आटपाडी तालुक्यातील कौठुळी गावच्या या पठ्ठ्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. याचे कारण म्हणजे सांगली जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याला बारावीच्या परीक्षेत केवळ पास होण्यापुरते म्हणजेच ३५ टक्के गुण मिळाले आहेत. त्याने प्रत्येक विषयात ३५ गुण मिळवत विक्रम केला आहे. हेमंत हा आटपाडी तालुक्यातील कौठुळी येथील रहिवासी आहे.
हेमंत हा व्यावसायिक अभ्यासक्रमातील टेक्नॉलॉजी विभागाचा विद्यार्थी असून, त्याने इंग्रजी, मराठी, इंजिनिअरिंग ड्रॉइंग, वर्कशॉप सायन्स अँड कॅल्क्युलेशन, ट्रेड थिअरी आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल्स या विषयांचा पेपर दिला होता. या सर्व विषयांत त्याला समान म्हणजेच ३५ टक्के गुण मिळाले आहेत.बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदा राज्याचा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. यावर्षीही मुलींनी बाजी मारत मुलांना मागे टाकले आहे. ९४.५८ टक्के बारावीतील मुली अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाल्या असून, मुलांचा ८९.५१ टक्के निकाल लागलेला आहे. राज्यातील बारावी पास मुलांचे कौतुक होत आहे. यात हेमंतची चर्चाही सर्वाधिक झाली. सर्व विषयातील ३५ टक्के गुण कौतुकाचा विषय ठरला आहे.
सोशय मीडियावर चर्चेतहेमंतने एकूण ६०० गुणांपैकी २१० गुण मिळवत बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. हेमंतने आपले बारावीचे शिक्षण दिघंची येथील इंद्रभाग्य पद्मिनी महाविद्यालयातून घेतले आहे. हेमंत सटाले याचे गुणपत्रक सोशल मीडियात व्हायरल होत असल्याने तो चांगलाच चर्चेत आला आहे.