वारणावती (जि. सांगली) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या बफर झोनमध्ये वाढलेल्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांचे जीवन धोक्यात आले आहे. शाहूवाडी तालुक्यातील उखळू, उदागिरी, निनाई परळे, आंबा व शिराळा तालुक्यातील मणदूर या गावांमध्ये बिबटे, वाघ व गव्यांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या जनहित याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचने गंभीर दखल घेत राज्य सरकारला जाब विचारला आहे. हरीश कांबळे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर (पीआयएल क्र. ०८/२०२६) न्यायमूर्ती आर. जी. अवचट व न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकेची ‘तातडीची सुनावणी’ म्हणून नोंद घेऊन एका दिवसात सुनावणी घेतली.सुनावणीदरम्यान न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सरकारला नोटीस बजावली.न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, वन्यप्राणी आता केवळ ग्रामीण भागापुरते मर्यादित न राहता शहरी भागातही शिरकाव करत आहेत, ही चिंताजनक बाब आहे, तसेच हल्ल्यात मृत्यू झालेल्या किंवा जखमी नागरिकांना वेळेवर व पुरेशी नुकसानभरपाई मिळते का याची विचारणाही खंडपीठाने केली. न्यायालयाने राज्य सरकारला ५ मार्च रोजीच्या पुढील सुनावणीस सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी कोणत्या ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत, याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत.काय आहे प्रकरण?शाहूवाडी व शिराळा तालुक्यातील गावांत वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. ३० जानेवारी रोजी राजवीर पाटील (७) या चिमुकल्याचा हल्ल्यात मृत्यू झाला, तर स्वरांजली पाटील (वय ८) हिला तिच्या १२ वर्षीय भावाने बिबट्याच्या जबड्यातून वाचवले. ग्रामस्थांच्या जीवित सुरक्षेसाठीच ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
Web Summary : Bombay High Court addresses rising wildlife attacks near Sahyadri Tiger Reserve. Government is ordered to report on safety measures after fatal incidents involving leopards and gaur. Compensation for victims is also under scrutiny.
Web Summary : बॉम्बे हाईकोर्ट ने सह्याद्री बाघ अभ्यारण्य के पास वन्यजीव हमलों पर सरकार से सुरक्षा उपायों पर रिपोर्ट मांगी। तेंदुए और गौर के हमलों के बाद पीड़ितों के मुआवजे पर भी जांच की जा रही है।