इंधन कंपन्यांच्या 'या' धोरणाने पंपचालकांचे गणित बिघडले, दराच्या भीतीने साठा करण्यास टाळाटाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 15:52 IST2026-03-26T15:51:51+5:302026-03-26T15:52:35+5:30
इंधन संपल्याच्या पाट्या झळकल्या

इंधन कंपन्यांच्या 'या' धोरणाने पंपचालकांचे गणित बिघडले, दराच्या भीतीने साठा करण्यास टाळाटाळ
सदानंद औंधे
मिरज (जि. सांगली) : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन कंपन्यांनी आगाऊ रक्कम घेऊनच पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरू केल्याने पंप चालकांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. परिणामी, काही ठिकाणी पंप कोरडे पडत असल्याने इंधन टंचाईच्या भीतीने नागरिक पंपांवर मोठी गर्दी करत आहेत.
इराण-अमेरिका युद्धामुळे इंधनाची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑइल या कंपन्यांनी उधारीवर इंधन विक्री बंद केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पंपचालकांना किमान १२ हजार लिटर इंधनासाठी ११.५० लाख रुपये आगाऊ जमा करावे लागत आहेत. यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत पंपचालक अडचणीत आहेत.
वाचा: सांगली जिल्ह्यात पेट्रोल २५ लाख, डिझेल २६ लाख लिटर शिल्लक; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती
पूर्वी इंधन मागवल्यानंतर चार दिवसांच्या उधारीवर पुरवठा होत होता; मात्र नव्या धोरणामुळे पैसे भरल्यानंतरही इंधन येण्यासाठी किमान सहा ते बारा तासांचा कालावधी लागत असल्याने अनेक पंप तात्पुरते कोरडे पडत आहेत. एखाद्या पंपावर इंधन नसल्याचे दिसताच इतर पंपांवर ग्राहकांची गर्दी होत आहे.
इंधन मागणीत २५ टक्के वाढ
मिरज शहर व ग्रामीण भागात एकूण ४३ पेट्रोल पंप असून, सर्व पंप चालकांना इंधन संपण्यापूर्वीच आगाऊ पैसे भरून मागणी नोंदवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, टंचाईच्या भीतीने इंधनाच्या मागणीत २५ टक्के वाढ झाल्याचे पुरवठा अधिकारी वर्षा कदम यांनी सांगितले.
चार कोटी लिटर साठा
मिरज रेल्वे स्थानकाजवळील डेपोतून सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना दररोज सुमारे १५ लाख लिटर इंधनाचा पुरवठा सुरू आहे. इंडियन ऑइलकडून सुमारे १२५ व भारत पेट्रोलियमकडून १५० टँकरद्वारे पुरवठा सुरू आहे. दोन्ही डेपोत सुमारे चार कोटी लिटर इंधनसाठा असून, मुंबईहून रेल्वे वॅगनद्वारे पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दराच्या भीतीने साठा करण्यास टाळाटाळ
सद्यस्थितीत इंधन दरात वाढ झालेली नाही; मात्र युद्ध संपल्यास दर अचानक घसरण्याची शक्यता असल्याने पंपचालक मोठा साठा करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे वाढलेल्या मागणीच्या तुलनेत इंधन पुरवठा उशिरा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.