सांगली : जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा आणि काँग्रेसच्या जयश्रीताई पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांचा शनिवारी सांगलीत विजय बंगल्यामध्ये सत्कार केला. यानिमित्ताने त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या हालचाली वेगवान झाल्याचे मानले जात आहे.सत्कारावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, उरुण-इस्लामपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक वैभव पवार उपस्थित होते. या वेळी निशिकांत पाटील यांनी दिवंगत नेते मदन पाटील यांच्या सहवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला. दोन्ही कुटुंबांचे ऋणानुबंध आजही कायम असल्याचे सांगितले. आठवडाभरापूर्वी जयश्रीताई पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचे संकेत दिले होते.त्या पाठोपाठ निशिकांत पाटील यांचा बंगल्यावरच सत्कार केल्याने त्यांचा पक्षप्रवेश जवळजवळ स्पष्ट झाला आहे. उपमुख्यमंत्री व पक्षाचे नेते अजित पवार लवकरच सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या वेळी जयश्रीताई पाटील यांच्या जाहीर पक्षप्रवेशाचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. यापूर्वी पक्षात प्रवेश केलेले माजी आमदार विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक, राजेंद्रअण्णा देशमुख, अजितराव घोरपडे यांचाही जाहीर प्रवेश याच कार्यक्रमात होण्याची शक्यता आहे.
जयश्रीताई पाटील यांनी विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसविरोधात बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. त्याचा फटका कॉंग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना बसला होता. त्यानंतर काँग्रेसने जयश्रीताई यांना पक्षातून निलंबित केले. सध्या त्या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महापालिकेसह मिरज तालुक्यात मदनभाऊ गट अद्याप सक्रिय आहे. आपली राजकीय ताकद राखून आहे. या गटाला सोबत घेऊन आपली ताकद वाढवण्यासाठी विविध राजकीय पक्षही उत्सुक आहेत. महापालिकेत या गटाचे २५ नगरसेवक आहेत. त्यामुळे जयश्रीताई पाटील यांच्या निर्णयाचा राजकीय परिणामही दिसून येणार आहे.
आठवडाभरात दोन नेते बंगल्यावरनुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांची निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर शनिवारी निशिकांत पाटील यांच्याही सत्काराचा कार्यक्रम झाला. एकाच आठवड्यात दोन पक्षांचे नेते बंगल्यावर आल्याने जयश्रीताई यांच्या पक्षप्रवेशाच्या हालचाली गतिमान झाल्याचे दिसत आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीत जयश्रीताई यांनी अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात आग्रह धरला होता. त्याची दखल घेत जयश्रीताईंना निर्णय घ्यावा लागणार आहे.
निवडणुकीत ताकद दाखवावी लागणारमहापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका या वर्षाअखेर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांत मदनभाऊ पाटील गटाची ताकद दाखवून द्यावी लागणार आहे. त्यामुळेच जयश्रीताईंचा पक्षप्रवेश शक्य तितक्या लवकर होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.