Sangli: काँग्रेस बंडखोर जयश्रीताईंच्या बैठकीत भूमिकेचा संभ्रम कायम, पाच दिवसांत निर्णय घेण्याचे कार्यकर्त्यांना आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:14 IST2025-06-05T18:14:10+5:302025-06-05T18:14:43+5:30
'अफवांवर विश्वास ठेवू नका'

संग्रहित छाया
सांगली : येथील विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्रीताई पाटील यांनी बुधवारी कळंबी (ता. मिरज) येथील बैठकीत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. प्रत्येक कार्यकर्त्याशी व्यक्तिगत संवाद साधून भूमिका जाणून घेतली. पण, या बैठकीत जयश्रीताई यांनी राष्ट्रवादी की भाजप, याबाबत कोणतीच भूमिका जाहीर केली नाही. पाच दिवसांत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे आश्वासन त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.
सांगली विधानसभा मतदारसंघात मदनभाऊ पाटील समर्थक कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. पण, विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न दिल्यामुळे कार्यकर्ते नाराज होते. कार्यकर्त्यांमुळे जयश्रीताई पाटील यांनी सांगली विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी केली होती. म्हणून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी जयश्रीताई पाटील यांची सहा वर्षांसाठी काँग्रेसमधून हकालपट्टी केली होती. त्यानंतर मदनभाऊ समर्थकांमध्ये उलट-सुलट चर्चा रंगली होती.
आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही पक्षात प्रवेश करा, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी जयश्रीताई यांच्याकडे मांडली होती. यावर सर्वच कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी बुधवारी कळंबी येथे कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीस आजी-माजी नगरसेवक, काँग्रेसचे पदाधिकारी, मदनभाऊ युवा मंचचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जयश्रीताई यांनी प्रत्येक कार्यकर्त्याचे व्यक्तिगत मत जाणून घेतले. यावर काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, अशी सूचना केली. काही मोजक्याच कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेशाबद्दल भूमिका मांडली.
सर्व कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर जयश्रीताई पाटील यांनी सर्वांशी मी बोलली आहे. आता पाच दिवस मला विचार करण्यासाठी वेळ द्या. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना पटेल अशीच भूमिका जाहीर करणार आहे, असा शब्द जयश्रीताईंनी कार्यकर्त्यांना दिल्या.
अफवांवर विश्वास ठेवू नका : जयश्रीताई पाटील
मी कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली आहे. माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या कार्याचा मान व सन्मान राहील अशीच भूमिका घेणार आहे. महापालिका क्षेत्राचा विकास डोळ्यासमोर ठेवून कोणत्या पक्षात जायचे ते निश्चित करण्यात येईल. कार्यकर्त्यांचे हित बघून निर्णय घेतला जाईल. तुम्ही सर्वांनी निश्चिंत राहा. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन जयश्रीताई पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.