Sangli: सेल्फीच्या नादात नणंद-भावजयीने गमावला जीव, हिंगणगादे येथे तलावात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 14:18 IST2025-06-02T14:17:35+5:302025-06-02T14:18:31+5:30
स्थानिक नागरिक व नातेवाईकांनी या दोघींना पाण्यातून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

संग्रहित छाया
विटा : तलावाच्या पाण्यात पाय धुतल्यानंतर सेल्फी काढत असताना पाय घसरून खोल पाण्यात बुडाल्याने नणंद-भावजय असलेल्या तरुणींचा मृत्यू झाला. निशा दिगंबर आढगळे (वय २०) व मयुरी हणमंत आढगळे (वय १७), दोघीही मूळ गाव किर्लोस्करवाडी (ता.पलूस), सध्या रा. घानवड, ता. खानापूर) अशी मृत नणंद-भावजयीचे नावे आहेत. ही घटना रविवारी (दि.१) हिंगणगादे हद्दीतील तलावात घडली.
विटा पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार किर्लोस्करवाडी येथील आढगळे कुटुंब घानवड येथील एका पोल्ट्रीवर काम करीत आहे. निशा व मयुरी या नणंद-भावजय आहेत. मयुरीची नणंद निशा ही इचलकरंजी येथे राहते. ती रविवारी सकाळी घानवड येथे आली होती. दुपारी या दोघींही प्रातर्विधीसाठी हिंगणगादे हद्दीतील तलावाकडे गेल्या . त्यानंतर त्या दोघी पाय धुण्यासाठी तलावाच्या पाण्यात उतरल्या.
तेथे मोबाईलवर सेल्फी काढत असताना या दोघी पाय घसरून तलावातील खोल पाण्यात पडल्या. पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तेथे असलेले स्थानिक नागरिक व नातेवाईकांनी या दोघींना पाण्यातून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद विटा पोलिसांत झाली असून पोलिस उपनिरीक्षक पूजा महाजन पुढील तपास करीत आहेत.