औरंगाबाद नामांतरप्रश्नी राजकारण नको, एकनाथ शिंदे यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 17:13 IST2021-01-09T17:13:03+5:302021-01-09T17:13:54+5:30
Aurangabad renaming News : छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. त्याठिकाणच्या लोकांचीही तीच मागणी आहे. त्यामुळे आम्ही त्या मागणीला पाठींबा देत आहोत.

औरंगाबाद नामांतरप्रश्नी राजकारण नको, एकनाथ शिंदे यांचे आवाहन
सांगली - औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याची इच्छा बाळासाहेब ठाकरे यांचीच होती. त्यामुळे त्यांच्या विचाराशी, भूमिकेशी आम्ही प्रामाणिक आहोत. यावरुन कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये, असे मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. त्याठिकाणच्या लोकांचीही तीच मागणी आहे. त्यामुळे आम्ही त्या मागणीला पाठींबा देत आहोत. शासन म्हणूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीत यावरुन मतभेद असल्याचे चित्र चुकीचे आहे. यात राजकारण कुणीही आणू नये. त्यामुळे योग्य वेळी याचा निर्णय होईल. आमची भूमिका आम्ही ठामपणे मांंडली आहे. महाविकास आघाडीत तीन पक्ष असल्याने आमची कोंडी झाल्याची चर्चा चुकीची आहे.
एकही नगरसेवक नाही, तरीही निधी दिला
सांगली, मिरज व कुपवाड महापालिका क्षेत्रात आमचा एकही नगरसेवक नाही, तरीही आम्ही महापालिकेला निधी दिला. त्यामुळे आम्ही विकासकामे करताना राजकारण आणत नाही, ही गोष्ट स्पष्ट होते, असे शिंदे म्हणाले.
घटना दुर्दैवी, चाैकशी होणार
भंडारा जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात आग लागून दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी असून शासन या घटनेची चौकशी योग्य पद्धतीने करेल, असे मत एकनाथ शिंदे व पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी केली.