Sangli: जनावरांच्या बाजार बंदवरुन वादाला सुरुवात, गोसेवा आयोगाच्या आदेशास सभापतींचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 19:15 IST2025-06-03T19:15:33+5:302025-06-03T19:15:55+5:30

त्यांना अधिकार कोणी दिला ? 

A new controversy has arisen after the Maharashtra Goseva Commission directed to close all cattle markets in the state from June 3 to 8 | Sangli: जनावरांच्या बाजार बंदवरुन वादाला सुरुवात, गोसेवा आयोगाच्या आदेशास सभापतींचा नकार

संग्रहित छाया

मिरज : महाराष्ट्र गोसेवा आयोगाने ३ ते ८ जूनपर्यंत राज्यात सर्व पशू बाजार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. गोसेवा आयोगाचे आदेश लागू नसल्याची भूमिका बाजार समितीने घेतल्याने यावरुन संघर्ष उभा राहिला आहे. दुसरीकडे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पशू बाजार बंद झाल्यास कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होण्याची चिन्हे आहेत.

राज्य गोसेवा आयोगाने सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ३ जून ते ८ जूनपर्यंत गोवंशाची बेकायदा कत्तल रोखण्यासाठी जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात कोणत्याही गावात जनावरांचा बाजार भरवू नये, असे आयोगाने परिपत्रकात म्हटले आहे. राज्यात गायी व बैलांच्या कत्तलीवर बंदी घातली आहे. मात्र, आयोगाने या जनावरांसह मेंढ्या, बकरी, म्हैस अशा इतर प्राण्यांच्या बाजारास आठवडाभर बंदी घातली आहे.

मिरजेचा मंगळवार व बुधवारी भरणारा जनावर बाजार जिल्ह्यात सर्वात मोठा असून बकरी ईदसाठी बकरी व जनावरे खरेदीसाठी आसपासचे जिल्हे व कोकणातून लोक मिरजेत येतात.
आयोगाच्या आदेशाने मिरजेतील जनावर बाजार बंद ठेवणार नसल्याचे बाजार समिती सभापती सुजय शिंदे यांनी स्पष्ट केले. यास सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध करीत सभापती शिंदे यांची भेट घेतली. यामुळे शेतकरी, व संबंधित व्यावसायिकांचे नुकसान होणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

मिरजेतील बाजार बंद केल्यास कर्नाटकातील बाजारात येथील शेतकरी व खरेदीदारांना जावे लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण बाजार बंद ठेवू नये, अशी मागणी मिरजेतील मुस्तफा बुजरूक, मौला कुरणे, युनूस चाबूकस्वार, कामील बागवान यांनी सभापती शिंदे यांच्याकडे केली.

१० कोटीची उलाढाल

गतवर्षी जूनमध्ये मिरजेत जनावरांच्या बाजारात १० कोटी २९ लाख ५ हजाराची उलाढाल होऊन बाजार समितीला १ लाख ३९ हजार सेस मिळाला होता. यावर्षी २८ मे रोजी बाजारात ४ कोटी ९३ लाख रुपये किमतीच्या जनावरे खरेदी विक्रीपासून ५२ हजार उत्पन्न मिळाले. मंगळवार बाजारात ही मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.

त्यांना अधिकार कोणी दिला ?

गोसेवा आयोग आम्हाला थेट आदेश देऊ शकत नाही. पणन संचालकांचे याबाबत कोणतेही आदेश नसल्याने मिरजेचा जनावरांचा बाजार सुरू राहील. या बाजारात गोवंश विक्रीस प्रतिबंध करण्यात येईल, असे सभापती सुजय शिंदे यांनी सांगितले.

Web Title: A new controversy has arisen after the Maharashtra Goseva Commission directed to close all cattle markets in the state from June 3 to 8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.