Sangli: उमदी आश्रमशाळा विषबाधाप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल
By शीतल पाटील | Updated: August 31, 2023 19:05 IST2023-08-31T19:05:04+5:302023-08-31T19:05:23+5:30
१६८ मुलांना विषबाधा झाल्याचे स्पष्ट

Sangli: उमदी आश्रमशाळा विषबाधाप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल
जत : जत तालुक्यातील उमदी येथील समता आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधाप्रकरणी तीन दिवसांनी उमदी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेचा सचिव, दोन मुख्याध्यापक, दोन अधीक्षक यांचा समावेश आहे. बुधवारी रात्री उशिरा समाजकल्याणचे सहायक आयुक्त जयंत मुरलीधर चाचरकर यांनी फिर्याद दिली.
संस्थेचे सचिव श्रीशैल कल्लाप्पा होर्तीकर, मुख्याध्यापक सुभाषचंद्र महादेवाप्पा होर्ती, मुख्याध्यापक सुरेश चनगोंड बगली, अधीक्षक विकास तुकाराम पवार, अधीक्षिका अक्कमहादेवी सिद्धन्ना निवर्गी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या पाच जणांविरुद्ध बाहेरील कार्यक्रमाकरिता बनवलेले शिल्लक राहिलेले जेवण निष्काळजीपणे विद्यार्थ्यांना दिल्याने विषबाधा होऊन त्यांचे जीवितास व व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणून विद्यार्थ्यांना दुखापत पोचवली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा वाजण्याच्यादरम्यान समता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले होते. जेवल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याचे निदर्शनास येताच त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले. यामध्ये १६८ मुलांना विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले.
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्ह्यातील सर्वच यंत्रणा कामाला लागल्या. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. राज्य शासनाने याची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी सांगलीत पाठवले. चौकशी, तपासणी झाल्यानंतर अखेर बुधवारी रात्री उशिरा याप्रकरणी समाजकल्याणचे सहायक आयुक्त चाचरकर फिर्याद दिली.