Sangli: भोसेतील ४०० वर्षांपूर्वीचा वटवृक्ष कोसळला, सततच्या पावसाने मुळासकट उन्मळून पडला
By अविनाश कोळी | Updated: June 10, 2024 19:07 IST2024-06-10T19:05:58+5:302024-06-10T19:07:38+5:30
महामार्गास अडथळा ठरणाऱ्या या वृक्षाला वाचवण्यासाठी वनराई संस्थेसह पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केले होते.

Sangli: भोसेतील ४०० वर्षांपूर्वीचा वटवृक्ष कोसळला, सततच्या पावसाने मुळासकट उन्मळून पडला
सांगली : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसे (ता. मिरज) येथे असलेले ४०० वर्षांपूर्वीचे वडाचे झाड सोमवारी सलग पाऊस व वाऱ्यामुळे कोसळले. महामार्गास अडथळा ठरणाऱ्या या वृक्षाला वाचवण्यासाठी वनराई संस्थेसह पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केले होते. मात्र महामार्गाच्या कामात कमकुवत झालेला हा वृक्ष सततच्या पावसाने सोमवारी कोसळला. या वृक्षाचे आहे त्या जागी पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
भोसे येथील यल्लम्मादेवी मंदिरासमोर सुमारे चारशे वर्षांपूर्वीचा हा वटवृक्ष आहे. नागपूर रत्नागिरी महामार्गास अडथळा ठरणारा हा वृक्ष तोडण्याचा घाट महामार्ग प्राधिकरणाने घातला होता. मात्र, पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि वनराई संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वटवृक्षाखालीच उपोषण करून वृक्षतोडीला विरोध केला. या आंदोलनाची दखल घेऊन तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी हा वटवृक्ष तोडू नये, असे आदेश दिले. यासाठी कायद्यामध्येही बदल करण्यात आले.
त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही वटवृक्ष न तोडता रस्त्याचा आराखडा बदलण्याचे आदेश दिले. त्यानुसार नव्याने आराखडा बनवत वटवृक्षाला खेटून हा महामार्ग पुढे नेण्यात आला. मात्र, या कामाच्या दरम्यान, वृक्षाची मुळे कमकुवत झाली असावीत. गेले पाच दिवस या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. ओढ्याला प्रचंड पाणी असल्याने हा वटवृक्ष स्वतःच्याच भाराने कोसळला.