विकास शहा शिराळा : एकीकडे आपत्ती व्यवस्थापनाची तयारी सुरु असताना कृष्णा व भीमा नदी खोऱ्यातील पर्जन्यमापक यंत्रणा ११ जून पासून कोलमडली आहे. ५२ यंत्र बंद असल्यामुळे पडणारा पाऊस, धरणातील पाणीसाठा, नदीची पाणीपातळी याची माहितीच उपलब्ध होणार नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कसे करणार?, असा प्रश्न पडला आहे.यंत्रणा चालविण्याचा पाच वर्षाचा करार दि.११ जूनला संपल्याने तसेच मंत्रालयातून नवीन करारास अद्याप मंजुरी मिळालेली नाही त्यामुळे ही यंत्रणा असून कुचकामी ठरली आहे.आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी पडणाऱ्या पावसाची नोंद व धरणातील पाणीसाठा याच्या गणितावर पाणी सोडण्याची यंत्रणा कार्यरत असते. पूर्वी शासकीय पातळीवर कर्मचारी वर्गामार्फत नोंदी घेतल्या जात होत्या, मात्र त्यास मर्यादा येत होत्या.आता स्वयंचलित ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. साटेलाईटद्वारा सकाळी ८ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८ अशी चोवीस तासातील माहिती संकलित केली जाते.ही यंत्रणा चालविण्यासाठी ऑपरेटर, अधिकारी आदींसाठी कंपनी बरोबर पाच वर्षांचा करार केला जातो. हा करार ११ जून रोजी संपला आहे. नवीन कराराचा प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत पडला आहे. याबाबत संबंधित कार्यालयास कोणतेही गांभीर्य नाही. सध्या पावसाचे प्रमाण जास्त असूनही यंत्रणा पावसाळ्यापूर्वी सुरू होणे आवश्यक होते.
२३ ठिकाणी यंत्रणा बंदकृष्णा नदी खोऱ्यात ५९ व भीमा नदी खोऱ्यात ७५ स्वयंचलित पर्जन्यमापन यंत्रणा बसविण्यात आली आहे. कृष्णा खोऱ्यातील आजअखेर यातील २३ यंत्रणा बंद पडल्या आहेत.
पाथरपुंज महत्त्वाचे ठिकाणचांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज हे केंद्र पावसाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे कारण येथे चेरापुंजी पेक्षाही जास्त पाऊस पडला होता. तसेच १जून २०२४ ते ३१ मे २०२५ यादरम्यान चेरापुंजीपेक्षा फक्त ६५० मिलिमीटर पाऊस कमी होता.
स्वयंचलित पर्जन्यमापन यंत्रणा चालविण्याबाबत असणारा पाच वर्षांचा करार दि.११ जून रोजी संपला आहे.जुन्या टेंडर करार मुदतवाढीचा तसेच नवीन टेंडर मंजुरीसाठी असे दोन प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच ही यंत्रणा सुरू होईल. - मयुरा जोशी, कार्यकारी अभियंता जल विज्ञान विभाग, सांगली.