येळावी : येळावी (ता. तासगाव) येथे येळावी-पलूस मार्गावर तासगाव डेपोतील चिंचवड-तासगाव या एसटीचा दुपारच्या दरम्यान अपघात झाला. यात १७ प्रवासी जखमी झाले. जखमींवर येळावीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. यातील तिघांना पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिलला पाठविण्यात आले आहे.मंगळवार, दि. १७ रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान चालक ए.जे. सुतार व वाहक सुरेश भानुदास शेंडगे (वय ५८, रा.हातनूर) हे चिंचवडहून तासगावकडे एसटी घेऊन जात असताना येळावी येथील पेट्रोलपंपाच्या शेजारील वळणावर ट्रॅक्टरला पास करताना ब्रेक मारल्याने व पावसामुळे रस्त्यावर दलदल झाल्याने एसटीवरील ताबा सुटून ती रानात शिरली. एसटीत एकूण ३२ प्रवासी प्रवास करत होते. यात १७ प्रवासी जखमी झाले आहेत. संबंधित प्रवाशांवर येळावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून १४ जणांना घरी पाठवण्यात आले आहे. तर इतर तिघांना सांगली सिव्हिलला पाठविण्यात आले आहे. सांगली सिव्हिलला पाठवलेल्यांत पूजा संदीप माळी (वय २७, तासगाव), रेश्मा प्रकाश माळी (वय २०, तासगाव), सुमन बबनराव जाधव (वय ५९, पुणे) असून, किरकोळ जखमींमध्ये श्वेता विजय मानकर (वय २१, रा.तासगाव), प्राजक्ता विजय मानकर (वय २४, रा. तासगाव), मनीषा प्रशांत शिंदे (वय ४५, रा.तासगाव), रामसिंग मोहनराव पाटील (वय ४४, रा.तासगाव), राणी अमोल सुतार (वय ३८, रा.पाटण), योगिता रविराज कोकरे (वय ३३, रा. कराड), अनिल शिवलिंग मिरजकर (वय ६२, रा.तासगाव), सीताराम गोपाळ खाडे (वय ६०, रा.किलोस्करवाडी), शालन अण्णा माळी (वय ६०, रा.तासगाव), संदीप अण्णा माळी (वय ३५, रा.तासगाव), मनीषा गणेश पवार (वय ४५, रा.धनगाव), रविराज यशवंत कोकरे (वय ४२, रा.कराड), शोभा प्रकाश मंडले (वय ४३, रा.मिरज) व अनुराधा कुमार सारापुरे (वय ६०, रा.तासगाव) यांचा समावेश आहे.
दैव बलवत्तर म्हणून वाचलेबस गटार पार करून रानात शिरली. ज्या ठिकाणी थांबली तिथून फक्त दोन फुटावर जवळपास पन्नास फुट बाय ४० फुट घेराची विहीर असून, त्या विहिरीला लागूनच दुसरी त्याच क्षेत्रफळाची विहीर आहे. बस अजून दोन फुट जरी पुढे गेली असती तर वेगळा अनर्थ घडला असता. हे दृश्य पाहून अनेक प्रवासी व आलेले नागरिक भीती व्यक्त करत होते.