(Image Credit : Undone Redon)
दोन लोकांची एका गोष्टीवर सारखीच सहमती असावी हे गरजेचं नाही. दोघांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद, विवाद आणि भांडणं होणं सामान्य बाब आहे. पण जर तुम्ही विवाहित कपल असाल तर छोट्या छोटया गोष्टींवरून भांडण करत राहिल्याने नात्यावर वाईट प्रभाव पडतो. अशात जर तुम्हाला हॅपी कपल बनायचं असेल तर उगाच कारणांवरून पार्टनरसोबत भांडण करणं, चिडचिड करणं बंद केलं पाहिजे.
दररोजची किरकिर
जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत लॉंग टर्म रिलेशनशिपमध्ये असता, खासकरुन लग्नाच्या. तेव्हा अर्थातच दोघांनाही एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टी किंवा वाईट सवयी आवडत नसतात. यामुळे दोघांनाही त्रास होऊ शकतो. तसेच या गोष्टींकडे अधिक जास्त लक्ष दिलं तर नात्यात स्ट्रेस आणि अडचण अधिक वाढते. त्यामुळे अशाप्रकारच्या मुद्द्यांवर प्राथमिकता ठरवा आणि फार जास्त गंभीर मुद्दे असतील तर त्यावरच पार्टनरसोबत बोला. यावेळी हे लक्षात ठेवा की, तुम्ही पार्टनरवर टिका करत नाही आहात, तुम्ही त्यांचा व्यवहार सुधारण्याचा प्रयत्न करत आहात.
लग्नाबाहेर पार्टनरची लाइफ
जर तुमचं लग्न झालं असेल तर याचा अर्थ हा नाही की, लग्नाबाहेर तुमची किंवा तुमच्या पार्टनरची लाइफ नाही. अशात जर तुम्हाला हॅपी कपल व्हायचं असेल तर पार्टनरच्या आवडी-निवडी, त्यांचे मित्र आणि इतरही काही गोष्टींना महत्त्व द्या. जर तुमचा पार्टनर तुम्हाला पुरेसा वेळ देत असेल तर तुम्हीही त्यांच्या लग्नाबाहेरच्या सवयींना, लाइफला महत्त्व दिलं पाहिजे.
सोशल मीडिया हॅबिट्स
अलिकडे गॅजेट्स आणि सोशल मीडियाची सवय अनेकांमध्ये बघायला मिळत आहे. यामुळे अनेक नात्यांमध्येही दरार पडल्याची बघायला मिळते. त्यामुळे तुमच्या किंवा पार्टनरच्या सोशल मीडियात हॅबिट्सबाबत आधीच बोललं पाहिजे. मोबाइलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा पार्टनरला वेळ कसा देता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. जर तुमच्यात चांगला संवाद झाला तर नक्कीच तुम्हाला हॅपी कपल व्हायला वेळ लागणार नाही.
होऊ गेलेल्या गोष्टींवर वाद नको
ज्या गोष्टी आधी घडून गेल्या आहेत आणि त्या आता आयुष्यात नाही, अशा गोष्टींवर वाद घालून काय फायदा. पुढील आयुष्य चांगलं जगायचं सोडून भूतकाळाच्या खिपल्या काढत बसण्यात काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा भविष्यात कसं चांगलं वागता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. झालं ते झालं.
कोण बरोबर कोण चूक
हॅपी कपल कधीच ब्लेम गेम खेळत नाहीत. ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत नाहीत. जर तुम्ही तुमच्या पार्टनरला एखाद्या गोष्टीसाठी दोष द्याल तर तुमच्या पार्टनरही तुम्ही कशासाठी तरी दोषी ठरवेल. त्यापेक्षा पार्टनरच्या दृष्टीकोनाला समजून घेण्याचा प्रयत्न करा. असं केल्याने कोण बरोबर कोण चूक अशी स्थिती निर्माणच होणार नाही.