आंबा उत्पादन कमीच, वाशीमधील विक्रेते प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 17:22 IST2026-03-11T17:22:31+5:302026-03-11T17:22:50+5:30
रत्नागिरी : हवामानातील सातत्यपूर्ण बदलाचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे मोहर काळा पडून गळून गेला आहे. मेल ...

संग्रहित छाया
रत्नागिरी : हवामानातील सातत्यपूर्ण बदलाचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे मोहर काळा पडून गळून गेला आहे. मेल मोहराचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे फळधारणा न झाल्याने यावर्षी जेमतेम १५ ते २० टक्केच आंबा उत्पादन झाले आहे. सद्यस्थितीत कोकणातून दिवसाला ४०० ते ५०० आंबा पेट्या विक्रीला वाशी बाजारात जात आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पेट्यांची संख्या केवळ १०० ते १५० इतकेच आहे.
यावर्षी नोव्हेंबरपर्यंत पाऊस लांबल्याने फुलोरा मोठ्या प्रमाणावर आला. परंतु, कडाक्याच्या थंडीमुळे आवश्यक फळधारणा झालीच नाही, शिवाय मोहर काळा पडला. या परिस्थितीमुळे खत व्यवस्थापनापासून मोहर, फळे वाचविण्यासाठी बागायतदारांनी केलेला खर्चही वाया गेला आहे. सुरुवातीच्या काळात आंबा पिकाचे प्रमाण कमी राहिल्याने बाजारात पुरेसा आंबा दाखल झाला नाही.
हवामानातील बदलामुळे बहुतांश आंबा हा दि. २० मार्चपासूनच तयार होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक बदलाचा परिणाम आंबा पिकावर हाेत असतानाच काही बागायतदारांनी माेठ्या कष्टाने हा आंबा वाचविला. हा तयार झालेला आंबा बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. मात्र, त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
वाशी बाजारात कोकणातून माेठ्या प्रमाणात हापूस आंबा विक्रीसाठी पाठविण्यात येताे. मात्र, यावर्षी उत्पादनच कमी झाल्याने वाशी बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या आंब्याचे प्रमाण कमी आहे. सध्या ४०० ते ५०० पेट्या वाशीला जात असून, त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील अवघ्या १०० ते १५० पेट्यांचा समावेश आहे. त्या तुलनेने तामिळनाडू राज्यातून हापूस, बदामी, लालबा, नीलम, ताेतापुरी या प्रकारच्या आंब्याच्या ५००० पेट्या वाशी बाजारात येत आहेत. तामिळनाडूच्या तुलनेत कोकणातील आवक अत्यल्प आहे.
सहा ते दहा हजार रूपये दर
सध्या आवक कमी असल्यामुळे आंबा पेटीला सहा ते दहा हजार रूपये दर मिळत आहे. यावर्षी आंबा उत्पादनच कमी असल्यामुळे दर टिकून राहतील, असे सांगण्यात येत आहे.
गतवर्षी आवक जास्त दर कमी
गतवर्षी याच हंगामात कोकणातून दिवसाला ४ ते ५ हजार पेट्या विक्रीसाठी पाठविण्यात येत असत. यावर्षी ते प्रमाण ४०० ते ५०० पेट्या इतकेच आहे. गतवर्षी पेटीला २ ते ६ हजार रूपये दर मिळत होता, यावर्षी आवक कमी असल्यामुळे ६ ते १० हजार रूपये दर मिळत आहे.
यावर्षी हवामानातील बदलामुळे आंबा उत्पादनच कमी आहे. त्यामुळे बाजारपेठेतील आवक मंदावली आहे. गुढीपाडव्यानंतर आवक वाढेल. परंतु, दरवर्षीपेक्षा यावर्षी आंबाच कमी असल्यामुळे प्रमाण कमी असेल. उत्पादन कमी असल्यामुळे दर टिकण्याची शक्यता आहे. - संजय पानसरे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबई.