Ratnagiri: विहिरीत पाच गवे पडले, वन विभागाने मध्यरात्री तीन तास ‘रेस्क्यू ऑपरेशन’ करुन बाहेर काढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 13:50 IST2026-02-13T13:49:23+5:302026-02-13T13:50:08+5:30
सर्व गवे सुरक्षित

Ratnagiri: विहिरीत पाच गवे पडले, वन विभागाने मध्यरात्री तीन तास ‘रेस्क्यू ऑपरेशन’ करुन बाहेर काढले
देवरुख : काेरड्या विहिरीमध्ये पडलेल्या पाच गव्यांना काळाेखातच ‘रेस्क्यू ऑपरेशन’ करून बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले. सुमारे १५ ते २० फूट खाेल असणाऱ्या विहिरीतून गव्यांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने रस्ता तयार करण्यात आला. विहिरीबाहेर पडण्यासाठी रस्ता मिळताच गव्यांनी जंगलाच्या दिशेने धूम ठाेकली. हे ‘रेस्क्यू ऑपरेशन’ बुधवारी रात्री तब्बल तीन तास सुरू हाेते.
संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथे बुधवारी रात्री ११:३० वाजता संतोष प्रदीप खेडेकर यांच्या कोरड्या विहिरीमध्ये पाच गवे पडल्याची माहिती कृषी सहायक समीर दोरखडे यांनी वन विभागाला दिली. त्यानंतर संगमेश्वर व देवरुख परिमंडळाचे वन अधिकारी व कर्मचारी आवश्यक साहित्यासह घटनास्थळी पाेहाेचले.
या ठिकाणी पाहणी केली असता ही विहीर कोरडी असल्याचे लक्षात आले. तसेच विहीर सुमारे १५ ते २० फूट खोल व सुमारे पंधरा फूट व्यासाची हाेती. बॅटरीच्या उजेडात विहिरीची पाहणी केली असता दोन मोठे पूर्ण वाढ झालेले गवे व तीन छोटे गवे असे पाच गवे विहिरीत असल्याचे लक्षात आले.
विहिरीची उंची जास्त असल्याने त्यांना विहिरीबाहेर पडता येत नव्हते. त्यामुळे पडीक विहिरीला एका बाजूने जेसीबीच्या सहाय्याने रस्ता तयार करण्यात आला. त्यानंतर पाचही गवे सुरक्षितपणे मध्यरात्री १:३० वाजता बाहेर काढण्यात आले.
हे ‘रेस्क्यू ऑपरेशन’ संगमेश्वर देवरुखचे वनपाल सागर गोसावी, फुणगूसचे वनरक्षक आकाश कडूकर, आरवलीचे वनरक्षक सूरज तेली व साखरप्याचे सहयोग कराडे यांनी केली. यासाठी स्थानिक ग्रामस्थांनीही सहकार्य केले.
सर्व गवे सुरक्षित
विहिरीत पडलेले पाचही गवे नैसर्गिकरीत्या जंगलाच्या दिशेने सुरक्षित निघून गेले. या गव्यांमध्ये एक मोठा नर व मादी तसेच त्यांची तीन पिल्ले हाेती. या गव्यांना कोणतीही इजा अथवा दुखापत झालेली नसल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.