आजारपणातून वाचली तरीही चिमुकल्या शौर्याच्या मृत्यूने हळहळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 16:05 IST2021-03-09T16:03:19+5:302021-03-09T16:05:05+5:30
Death Chiplun Ratnagiri- जन्मानंतर तिला काविळ झाली. मात्र, योग्य उपचारानंतर ती पूर्णपणे बरी झाली. त्यातून सावरल्यानंतरही तिच्या आयुष्याची दोरी अर्ध्यावरच तुटली. आपल्याच आईच्या हातून चिमुकल्या शौर्याचा अंत झाला आणि आयुष्य उमलण्यापू्र्वीच खुंटून गेले. चिमुकल्या शौर्याच्या अशा मृत्यूमुळे तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

आजारपणातून वाचली तरीही चिमुकल्या शौर्याच्या मृत्यूने हळहळ
चिपळूण : जन्मानंतर तिला काविळ झाली. मात्र, योग्य उपचारानंतर ती पूर्णपणे बरी झाली. त्यातून सावरल्यानंतरही तिच्या आयुष्याची दोरी अर्ध्यावरच तुटली. आपल्याच आईच्या हातून चिमुकल्या शौर्याचा अंत झाला आणि आयुष्य उमलण्यापू्र्वीच खुंटून गेले. चिमुकल्या शौर्याच्या अशा मृत्यूमुळे तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
तालुक्यातील वहाळ-घडशीवाडी येथील शिल्पा प्रवीण खापले (३५) हिने आपल्या हाताने स्वतःच्या चिमुकल्या मुलीचा अर्थात शौर्याचा बळी घेतला. मुलगी नको म्हणून हे कृत्य तिच्या हातून घडल्याचे पोलिसांच्या चौकशीत प्रथमदर्शनी पुढे आले आहे. याविषयी पोलीस सर्व बाजूंनी सखोल चौकशी करीत आहेत. सोमवारी खापले यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य व नातेवाईकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. अजूनही चौकशी सुरूच आहे.
आतापर्यंत झालेल्या चौकशी दरम्यान काही धक्कादायक माहिती पुढे आली आहे की, शौर्या काही दिवस काविळने आजारी पडली होती. तिच्यावर सावर्डे येथे एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यातून ती बरी होऊन हत्येपूर्वी दोन दिवस आधीच तिला घरी आणले होते. परंतु हसत्या-खेळत्या शौर्याचा तिच्याच आईने जीव घेतला. या घटनेनंतर पोलीसही चक्रावून गेले आहेत.
याप्रकरणी शिल्पा खापले हिला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याने तिचीही कसून चौकशी केली जात आहे. याप्रकरणी तिच्यावर कोणी दबाव टाकला होता का, याविषयीही पोलीस तपास करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी हे स्वतः याप्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत.
का घडले असे कृत्य?
भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असलेल्या प्रवीण बाळाराम खापले यांची ही दुसरी मुलगी होती. त्यांची मोठी मुलगी पाच वर्षांची आहे. तर महिनाभरापूर्वीच त्यांच्या घरी शौर्या या चिमुकलीने जन्म घेतला होता. दुसऱ्यांदा मुलगी झाली म्हणून दोघांना कोणतेही नैराश्य नव्हते. उलट तिसऱ्या अपत्याच्या जन्माविषयी पती-पत्नीत चर्चा झाली होती, असे पोलीस चौकशीत पुढे आले आहे. तरीही शिल्पाच्या हातून हे क्रूर कृत्य घडल्याने पोलिसांनाही आश्चर्य वाटत आहे.