रत्नागिरी :  चिपळूण तालुक्यातील अभियंत्यांनी सुरु केली अळंबीची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 15:05 IST2018-08-24T15:04:35+5:302018-08-24T15:05:56+5:30

अभ्यासात हुशार असल्याने तो सिव्हील इंजिनिअर बनला. पण घरची परिस्थिती बेताची. त्यातच आई-वडिलांचा शेती हाच व्यवसाय. याच अल्पशा जागेत काहीतरी सोनं पिकवण्याचा निर्णय त्याने घेतला. आज त्याने आपल्या चार मित्रांसोबत अळंबीचा व्यवसाय सुरु केला आहे. त्यातून त्याला चांगला नफाही मिळू लागला आहे.

Ratnagiri: Urbane farming started by engineers in Chiplun taluka | रत्नागिरी :  चिपळूण तालुक्यातील अभियंत्यांनी सुरु केली अळंबीची शेती

रत्नागिरी :  चिपळूण तालुक्यातील अभियंत्यांनी सुरु केली अळंबीची शेती

ठळक मुद्देचिपळूण तालुक्यातील अभियंत्यांनी सुरु केलीअळंबीची शेतीदिवसाला पाच किलो अळंबीचे उत्पादन

विहार तेंडुलकर

रत्नागिरी : अभ्यासात हुशार असल्याने तो सिव्हील इंजिनिअर बनला. पण घरची परिस्थिती बेताची. त्यातच आई-वडिलांचा शेती हाच व्यवसाय. याच अल्पशा जागेत काहीतरी सोनं पिकवण्याचा निर्णय त्याने घेतला. आज त्याने आपल्या चार मित्रांसोबत अळंबीचा व्यवसाय सुरु केला आहे. त्यातून त्याला चांगला नफाही मिळू लागला आहे.

मनोज घाणेकर असे या तरूणाचे नाव. चिपळूण तालुक्यातील निवळी - कोदारेवाडी येथे छोट्याशा खोलीतच त्याने आपले अळंबीचे शेत तयार केले आहे. त्याच्या या अळंबी शेतीत सागर कोदारे, योगेश गावडे, स्वप्नील गावडे, यतीन गावडे हे तरूणही सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व तरूण उच्चशिक्षित आहेत. मनोज घाणेकर व सागर कोदारे हे दोघेही सिव्हील इंजिनिअर आहेत. तर योगेश गावडे हा मोटार मेकॅनिक, स्वप्नील गावडे याने डी. फार्मसी केले असून, यतीन गावडे हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत.

दिवसाला पाच किलो अळंबीचे उत्पादन हे सर्वजण घेतात. आपापला व्यवसाय संभाळून हे सारेजण दररोज एक तास अळंबी लागवडीसाठी देतात. अळंबीला सध्या बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे अळंबी तयार झाल्यानंतर लगेचच त्याची विक्री होते. एक किलो अळंबीसाठी केवळ ५० रुपये खर्च येतो आणि हीच अळंबी बाजारात ३५० ते ४०० रुपये किलो दराने विकली जाते, असे मनोज घाणेकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे या व्यवसायासाठी कोणतेही भांडवल लागत नाही. त्यांच्या शेतीत धिंगरी प्रकारची अळंबी फुलतात.

आहारातील महत्त्व

अळंबीमध्ये २.७८ टक्के प्रोटीन असतात तर फायबर ९.८ टक्के असते. अळंबीमध्ये अन्य जीवनसत्वही खूप मोठ्या प्रमाणात असतात. महिन्याला घाणेकर यांना ३० ते ३५ हजार रुपये नफा मिळतो. दिवसातील केवळ एक तास देऊन एवढा नफा मिळवून देणारी ही शेती आहे.

मोठी मागणी

नैसर्गिक अळंबी ही केवळ पावसाळ्यातील तीन महिन्यांपैकी एक-दीड महिनेच मिळते. मात्र, शेतीतून अळंबी वर्षभर मिळते. त्यामुळे अळंबीला वर्षभर मागणी असते. रत्नागिरी जिल्ह्यात त्यामानाने अळंबीचे उत्पादन कमी असल्याने अळंबी बाहेरूनच मागवावी लागते.
 

Web Title: Ratnagiri: Urbane farming started by engineers in Chiplun taluka