रत्नागिरी : दारुबंदीतून जमलेल्या पैशातून उभारली नळपाणी योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 18:25 IST2018-04-05T18:25:05+5:302018-04-05T18:25:05+5:30
चिपळूण तालुक्यातील खेरशेत - बेंडलवाडीतील ग्रामस्थांनी ३५ वर्षांपूर्वी दारुबंदी करून जमा झालेल्या रकमेतून ३५ लाख रुपयांमधून नळपाणी योजना राबवली. त्यामुळे वाडीतील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. हे काम वाखाणण्याजोगे असून, त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे.

रत्नागिरी : दारुबंदीतून जमलेल्या पैशातून उभारली नळपाणी योजना
आरवली : चिपळूण तालुक्यातील खेरशेत - बेंडलवाडीतील ग्रामस्थांनी ३५ वर्षांपूर्वी दारुबंदी करून जमा झालेल्या रकमेतून ३५ लाख रुपयांमधून नळपाणी योजना राबवली. त्यामुळे वाडीतील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. हे काम वाखाणण्याजोगे असून, त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे.
लोकांना पाणी देणे, हे राज्यकर्त्यांचे काम असते, जे सत्तेत असतात ते नेहमी पाणी, रस्ते आणि वीज या विषयावर राजकारण करत आम्ही करुन दाखवल्याचा बावटा मिरवत असतात. जिल्ह्यात विविध ठिकाणी नळपाणी योजनांवर करोडो रुपये खर्च होत आहेत. तरीही जिल्हा टंचाईमुक्त होऊ शकला नाही. मात्र, खेरशेत - बेंडलवाडी ग्रामस्थांनी स्वत: पुढाकार घेत एक गाव टंचाईमुक्त केले आहे.
खेरशेतमधील सार्वजनिक विहिरीचे पाणी भरताना सन २०१४मध्ये पाच महिला विहिरीत कोसळल्या होत्या. त्यापैकी चारजणींना वाचवण्यात यश आले. मात्र, त्यावेळी दर्शना आग्रे या ३३ वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. त्यावेळी घटलेल्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला होता.
लोकप्रतिनिधी, अधिकारी घटनास्थळी धावून आले. विहीर बांधण्याचे आश्वासन दिले गेले. मात्र दिलेले आश्वासन हवेत विरले. विहीर अथवा नळपाणी योजना झालीच नाही; अखेर येथील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बेंडलवाडीतील ग्रामस्थांना पुढाकार घ्यावा लागला.
सोमा बेंडल, चंद्र्रकांत बेंडल, रघुनाथ बेंडल, भार्गव फेपडे, नारायण आग्रे आदी कार्यकर्त्यांनी योजना राबवण्यासाठी मेहनत घेतली. बेंडलवाडीतील ३५ कुटुंबानी मिळून ३५ लाखाची रक्कम उभी केली. वर्गणी व श्रमदानातून ३५ कुटुंबानी मिळून ३५ लाखाची योजना उभारणे, हे कार्य कौतुकास्पद असून, लोकप्रतिनिधींसह प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे.
खेरशेत - बेंडलवाडी ग्रामस्थांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली तरीही आमचे हात छोटे पडतील, असे गौरवोद्गार उद्घाटनप्रसंगी सुरेश भायजे यांनी काढले. नळपाणी योजना उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या पूनम चव्हाण, माजी उपसभापती संतोष चव्हाण, चंद्र्रकांत जाधव, सरपंच संतोष मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.